Harshvardhan Sapkal’s scathing criticism of Devendra Fadnavis : माझ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा देणारे शिंदे सोलापूरकरच्या वक्तव्यावर गप्प का ?
Pune : छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करा व सुरक्षा मिळवा, अशी फडणवीस सरकारची योजना आहे. महाराजांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला सुरक्षा देण्यात आली असताना तो पळून जातो. कोरटकरचे, आयपीएस अधिकारी व गृहमंत्री यांच्याशी जवळचे हितसंबंध होते. त्याला पळून जाण्यात पोलिसांचीच फूस असावी, असा संशय व्यक्त करून कोरटकर पळून जात असताना सरकार काय करत होते ? गृहविभाग झोपला होता काय? असे संतप्त सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे.
पुण्यात आज (२२ मार्च) प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा दुसरा व्यक्ती राहुल सोलापूरकर पुण्यात राहतो. पण सोलापूरकरवर गुन्हा दोखल होऊ शकत नाही, असे पुण्याचे पोलीस आयुक्त सांगतात. त्याला पोलीस संरक्षण देतात. स्वारगेट बस स्टँडवर बलात्कार होतो. बीडमध्ये सरपंचाची क्रूर हत्या होते. परभणीत पोलीस कोठडीत तरुणाचा मृत्यू होतो. पुण्यातील केंद्रीय मंत्र्याच्या कार्यकर्त्याला मारहाण होते. दुसऱ्या केंद्रीय मंत्र्याच्या मुलीची जळगावात छेड काढली व तक्रार दाखल करायला मंत्र्यांना पोलीस स्टेशनला जावे लागते. राज्यात पोलिसांचा धाकच राहिला नाही. कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली असून देवेंद्र फडणविसांचा तुघलकी कारभार सुरु आहे.
Harshawardhan Sapkal : सोमनाथ सुर्यवंशी मृत्यू प्रकरण, फडणवीस सरकारने झोपेचे सोंग सोडावे !
राज्यातील कारभार पाहता तो क्रूर पद्धतीचा आहे. म्हणून औरंगजेबाचा कारभार व फडणवीसांचा कारभार सारखाच आहे, असे मी म्हणालो. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मी मुख्यमंत्र्यांची माफी मागावी, असे म्हणून माझ्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची शिंदेंनी मागणी केली. पण मी माझ्या विधानावर आजही ठाम आहे, माफी मागण्याचा प्रश्नच नाही. दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चौकशी करून कारवाई केली जाईल, असे सांगितले. माझ्या विधानावर कारवाईचा इशारा देणारे दोन्ही उपमुख्यमंत्री राहुल सोलापुरकरच्या विधानावर गप्प का आहेत, असा सवाल त्यांनी केला.
पुणे शहरात राज्यभरातून शिक्षणासाठी मुले मुली येतात. पण या शहरात आता ड्रग्जची खुलेआम विक्री होते आहे. गुजरातच्या कांडला बंदरातून ड्रग्ज येतात, त्याचा तपास केला जात नाही. महाराष्ट्राचा गृहविभाग घाशीराम कोतवाल चालवत आहे का, असा प्रश्न जनतेला पडला आहे. राज्यातील गृहविभागाचा कारभार पाहता राज्याला पूर्णवेळ सक्षम गृहमंत्र्याची गरज आहे, असेही सपकाळ म्हणाले.
Harshvardhan Sapkal : मी शेंगा खाल्ल्या नाही, टरफलं उचलणार नाही !
औरंगजेब जसा क्रूर होता तसेच इंग्रजसुद्धा क्रूर व जुलमी होते. त्यांनी जालियनवाला बाग हत्याकांड घडवले, भगतसिंग सारख्या अनेक क्रांतीकारकांना फाशी दिली. त्या इंग्रजांचे हस्तक म्हणून या लोकांनी काम केले. ज्यांनी इंग्रजांची पेन्शन घेतली त्यांची स्मारके, पुतळे विश्व हिंदू परिषद व बजरंग दल उखडून टाकणार का, याचे उत्तर त्यांनी द्यावे, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
या पत्रकार परिषदेला प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी, माजी मंत्री रमेश बागवे, पुणे शहर काँग्रेस अध्यक्ष अरविंद शिंदे, पुणे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माजी आमदार संजय जगताप, संजय बालगुडे, अनंत गाडगीळ, दिप्ती चौधरी आदी उपस्थित होते.








