Congress leader Vijay Wadettiwar criticizes the government over the incident at Mangeshkar Hospital in Pune : मंगेशकर रुग्णालयाला चाप लावण्याची वेळ आली
Nagpur : पुण्यातील मंगेशकर रुग्णालयात पैसे दिले नाही, म्हणून रुग्णाला दाखल करून घेतले नाही. त्यात एक आईचा मृत्यू झाला. मंत्रालयातून फोन जाऊनदेखील जर रुग्णालय इतकी असंवेदनशीलता दाखवत असेल तर या रुग्णालयाला चाप लावण्याची वेळ आली आहे, अशी जळजळीत प्रतिक्रिया काँग्रेसचे विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.
मंगेशकर रुग्णालयात घडलेल्या प्रकाराबाबत त्यांनी X वर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणतात, आज भाजप आमदाराच्या जवळच्या व्यक्तीवर ही वेळ आली आहे, तर सामान्य जनतेचे काय हाल होत असतील? या निमित्ताने आरोग्य व्यवस्थेत सुरू असलेला माज चव्हाट्यावर आला आहे. राज्यात दोन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष असताना रुग्ण दगावत असेल, तर सरकारचा काय धाक आहे, हेच या रुग्णालयाने दाखवून दिले.
पुण्याचे मंगेशकर रुग्णालय सरकारने आपल्या ताब्यात घेण्याची वेळ आली आहे, या प्रकरणी जे दोषी आहेत, त्यांच्यावर कारवाई करावी. इतक्या असंवेदनशील लोकांची रुग्णालयात काम करण्याची पात्रता नाही. आता तरी सरकार म्हणून जागे व्हा. सामान्य लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या लोकांना धडा शिकवा, असे वडेट्टीवार म्हणाले.
हेच का लाडक्या बहीणीबद्दल प्रेम ?
पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाने पैशाच्या हव्यासापोटी एका बहीणीचा जीव घेतला. दोन कोवळ्या जीवांना अनाथ केले आहे. राज्य चालवणाऱ्या तीन भावांचे हेच का लाडक्या बहीणीबद्दलचे प्रेम, असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.
Vijay Wadettiwar : शेवटचे दोन दिवस उरले, विरोधी पक्षनेत्याची नियुक्ती करा !
मंगेशकर रुग्णालयात घडलेल्या घटनेवर सपकाळ यांनी X वर प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये ते म्हणाले, राज्य सरकारने रुग्णसेवेसाठी एक रुपया एवढ्या नाममात्र दरात या रुग्णालयाला जमीन दिली आहे. पण आपल्या मूळ उद्देशाला काळीमा फासून रुग्णालयाने रुग्णसेवेच्या नावाखाली सामान्यांची लूट चालवली असल्याचा घणाघाती आरोपही त्यांनी केला.
मंगेशकर रुग्णालयाच्या मुजोर प्रशासनाने मुख्यमंत्री कार्यालयातून आलेल्या फोनलाही प्रतिसाद दिला नाही. प्रसूती वेदनेने विव्हळत असणा-या तनिशा भिसे या भगिणीची पैशासाठी अडवणूक करून रुग्णालयानेच तिचा जीव घेतला आहे. राज्यात आरोग्यसेवेच्या नावाखाली लूट चालली आहे. ज्यांना देवदूत म्हटले जाते, ते डॉक्टरच यमदूत झाले आहेत. सरकारने यांचा तातडीने बंदोबस्त करून संदेश दिला पाहिजे, ज्यामुळे इतर रुग्णालयांनाही जरब बसेल, असेही सपकाळ म्हणाले.