Congress leader Vijay Wadettiwar said, Have thieves and police become brothers : चोर-पोलिस भाई-भाई झाले का ?
Nagpur : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर ज्या काही घडामोडी घडल्या. त्यानंतर बीड जिल्हा महाराष्ट्रभर बदनाम झाला. राज्यात अशा अशा घटना घडत आहेत की, महाराष्ट्र आता देशभरात बदनाम होत आहे. आज तर चोरट्यांनी कहरच केला. चक्क गृह राज्यमंत्र्यांचा फोन लंपास केला. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेची काय स्थिती आहे, याची कल्पना यावी, असे काँग्रेसचे विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार म्हणाले.
गृह राज्यमंत्री योगेश कदम आज (५ मार्च) बीडच्या दौऱ्यावर असताना ही घटना घडली. मंत्र्यांचा दौरा असला म्हणजे त्यांना पोलिस सुरक्षा असतेच. पोलिस, सुरक्षा रक्षकांच्या घेऱ्यात मंत्री महोदय चालत असतात. त्यातल्या त्यात योगेश कदम गृह राज्यमंत्री.. आणि अशात त्यांचाच फोन चोरीला गेला. अशा परिस्थितीत सामान्य लोकांच्या सुरक्षेचे काय, महिलांच्या सुरक्षेचे काय, कायदा व सुव्यवस्था आहे कुठे, असे प्रश्न पडल्यावाचून राहात नाहीत.
आता महाराष्ट्रात चोरांचे राज्य सुरू झाले, असे समजावे काय, असा प्रश्न विजय वडेट्टीवार यांनी केला. राज्यात चोर, गुंडे, बदमाश यांची हिंमत किती वाढली असावी? चोर-पोलिस भाई-भाई तर झाले नाही ना? ‘हम तुम्हारे बाप है’, असे तर चोरांना पोलिसांना सांगायचे नसेल ना, अशा प्रश्नांची सरबत्ती वडेट्टीवार यांनी केली. ते म्हणाले, आधीच बीड बदनाम आहे. अशा घटना घडत असतील तर बीडच्या बदनामीत आणखी भरच पडणार आहे, असेही ते म्हणाले.
कायद्याचा धाक फक्त कागदावर राहिला आहे. पोलिसांची गुंडांशी हातमीळवणी तर नाही ना, अशीही शंका येते. आता केवळ बीडच नाही तर राज्यातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे. मंत्रालयात सेल्फी काढणारे गुंड मोठे झाले आहेत, असे आता समजावे लागेल, असे म्हणत वडेट्टीवार यांनी सरकारला टोला लगावला.