Congress upset over Vanchit Bahujan Aghadi’s unilateral decision : वंचितच्या एकतर्फी निर्णयाने काँग्रेस नाराज, ठोस प्रस्ताव नसल्याचा वंचितचा दावा
Akola अकोला महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसशी आघाडी न करता थेट पाच उमेदवारांची घोषणा केल्याने शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेसकडून कोणताही ठोस प्रस्ताव न आल्याने आघाडी शक्य नसल्याचे कारण वंचितकडून पुढे करण्यात आले आहे. मात्र, या दाव्याला स्थानिक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी ठामपणे नाकारले असून, वंचितला चर्चेसाठी प्रत्यक्ष बोलावण्यात आल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. त्यामुळे आघाडीच्या शक्यतेवरून पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांची फेरी सुरू झाली आहे.
स्थानिक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे की, “वंचितला चर्चेसाठी बोलावण्यात आले होते. संवादाचे दरवाजे खुले होते. आम्ही आघाडीचे दोर कापलेले नाहीत. आजही आघाडीसाठी आमची तयारी आहे. व्यापक विरोधी एकजूट हीच काळाची गरज आहे.” काँग्रेसकडून आघाडीबाबत सकारात्मक भूमिका कायम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
दुसरीकडे, वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी सांगितले की, “आघाडीसाठी काँग्रेसकडून कोणताही अधिकृत प्रस्ताव आला नाही. वेळ निघून जात असल्याने आम्हाला उमेदवार जाहीर करावे लागले.” कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये आणि निवडणूक तयारीला गती मिळावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचेही वंचितने स्पष्ट केले आहे.
वंचितने जाहीर केलेल्या पाच उमेदवारांमुळे आगामी महापालिका निवडणुकीतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, दोन्ही पक्षांकडून परस्परविरोधी भूमिका मांडल्या जात असल्या तरी शेवटच्या क्षणी चर्चेची दारे उघडी राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, उमेदवार जाहीर झाल्याने आघाडीचा मार्ग अधिक गुंतागुंतीचा झाला आहे.
दरम्यान, या घडामोडींवर मतदारांमध्येही चर्चा सुरू असून, आघाडी होणार की दोन्ही पक्ष स्वतंत्र लढत देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येत्या काही दिवसांत काँग्रेस व वंचितची पुढील पावले अकोल्याच्या राजकारणाची दिशा ठरवणारी ठरणार आहेत.








