11 directors allege false resolutions were passed in bank meetings : ११ संचालकांचा आरोप; अध्यक्ष, सीईओंना पत्र
Amravati अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १ एप्रिल रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीतील काही ठराव इतिवृत्तात चुकीच्या पद्धतीने नमूद करण्यात आल्याचा गंभीर आरोप बबलू देशमुख गटातील ११ संचालकांनी केला आहे. ३० एप्रिल रोजी झालेल्या सभेत याबाबत नाराजी व्यक्त करत संचालकांनी सभा अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) यांना लेखी पत्र दिले.
या पत्रात त्यांनी ठरावातील अपारदर्शकतेबाबत तक्रार करत आर्थिक अपहाराचेही आरोप केले आहेत. नाबार्डच्या विषयांना मंजुरी देत उर्वरित सर्व विषय तात्पुरते नामंजूर करून आठ दिवसांत नव्याने सभा घेण्याची मागणीही करण्यात आली आहे. ११ संचालकांनी दिलेल्या पत्रानुसार, २३ ऑक्टोबर २०२४ रोजीच्या बैठकीतील विषय क्र. २ संदर्भात संचालक मंडळाने ‘ठराव नामंजूर’ ठरवला असताना, इतिवृत्तात ‘ठराव सर्वानुमते मंजूर’ असा खोटा उल्लेख करण्यात आला.
R. S. Gawai memorial : दादासाहेब गवई स्मारकासाठी १२ कोटींचा अतिरिक्त निधी!
तसेच, १ एप्रिल २०२५ रोजीच्या बैठकीत विषय क्र. ७ अंतर्गत समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला होता, मात्र ठरावात त्याचा उल्लेख करण्यात आलेला नाही. विषय क्र. २४ बाबतही संचालकांकडून मान्यता न मिळालेली असतानाही ‘११ संचालकांनी मान्यता दिली’ असा खोटा ठराव दाखवण्यात आला. विषय क्र. ४० संदर्भात ११ संचालकांनी लेखी मत नोंदवून विषय नामंजूर करण्याचे स्पष्ट कारण दिले होते, तरीही ‘ठराव सर्वानुमते मंजूर’ असा खोटा उल्लेख प्रोसिडिंग बुकमध्ये करण्यात आल्याचा आरोप आहे.
संचालक प्रकाश काळबांडे यांना नागपूर खंडपीठाने दिलेल्या स्थगिती आदेशाची बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सीईओंनी अवहेलना केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. काळबांडे यांनी स्थगिती आदेशाची माहिती बँकेला दिली असतानाही त्यांना बैठकीची नोटीस देण्यात आली नाही, जो न्यायालयाच्या आदेशाचा अवमान असल्याचे पत्रात नमूद आहे.
Ajit Pawar : अजित पवार म्हणाले, केंद्राचा निधी यायचा असेल तर राज्याचा वापरा, पण…
या सर्व घडामोडींवर ३० एप्रिलच्या सभेत निषेध नोंदवण्यात आला असून, आठ दिवसांत संचालक मंडळाची पुनर्भेट घेण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. ए. एस. देशमुख, व्ही. डब्ल्यू. जगताप, एस. एन. भारसाकळे, बी. बी. वानखडे, एस. बी. साबळे, एच. वाय. मोहोड, डी. एस. काळे, एस. बी. गावंडे, पी. बी. अलोणे, आर. व्ही. गायगोले आणि एम. एस. वानखडे या संचालकांच्या पत्रावर स्वाक्षऱ्या आहेत.