Voters expelled Sharad Pawar for playing politics of betrayal : मतदारांनीच हद्दपार केले; ॲड. आशिष शेलार यांचा हल्लाबोल
शरद पवार हे विश्वासघाताच्या राजकारणाचे जनक आहेत. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका करताना आपला तोल गमावला. आजवर विश्वासघाताचं आणि खंजीर खुपसण्याचं राजकारण केल्यामुळेच महाराष्ट्राच्या मतदारांनी तुम्हाला हद्दपार केलं, असा घणाघाती हल्ला मुंबई भाजपाचे अध्यक्ष आणि राज्याचे माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी चढवला.
भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत शेलार बोलत होते. यावेळी प्रदेश भाजपा समन्वयक विश्वास पाठक आणि भाजपाचे प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन उपस्थित होते. ‘ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ‘पुलोद’च्या निर्मितीबाबत बोलताना आपण जनसंघाच्या बळावर मुख्यमंत्री झालो हे मान्य केलं. मात्र हे सरकार बनवण्याआधी विश्वासघाताचं आणि खंजीर खुपसण्याचं कोणतं विचारमंथन तुम्ही केलं होतं? आणि कोणाच्या विरोधात केलं होतं? हे सत्य ही महाराष्ट्राच्या जनतेपुढे येऊ द्या,’ असं आवाहनही शेलार यांनी केलं.
‘केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना न्यायालयीन प्रक्रीयेद्वारे निर्दोषत्व मिळाले आहे. मात्र न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करून अमित शाह यांच्यावर तुम्ही टीका करणार असाल. तर ‘लवासा’पासून अनेक प्रकरणांमध्ये न्यायालयाने कोणाकडे बोट दाखवले आहे हे बोलायला आम्ही मोकळे आहोत,’ असा इशाराही शेलार यांनी दिला.
उद्धव ठाकरेंना विश्वासासघाताचं प्रशिक्षण
पवार साहेबांनी विश्वासघाताच्या राजकारणाचे प्रशिक्षण उद्धव ठाकरे यांना दिले आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर हे दिसून आले आहे. या विश्वासघाताच्या राजकारणाला महाराष्ट्राच्या जनतेने यावेळी मतपेटीतून उत्तर दिले आहे. सत्तेच्या लोभासाठी एकत्र आलेली ही महाविकास आघाडी एक्सपायरी डेट संपल्याने केव्हाही फुटण्याची शक्यता आहे, असा टोलाही शेलार यांनी लगावला.