nashik-ashok-kharat-case-sanjay-raut-cmo-leak-anjali-damania-claims : अंजली दमानिया यांच्या खुलाशांवरून संजय राऊतांचा गौप्यस्फोट
Mumbai: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवली असताना आता या प्रकरणाला नवे राजकीय वळण मिळाले आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी खरातच्या कॉल डिटेल्सबाबत केलेल्या खुलाशांनंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी थेट मुख्यमंत्री कार्यालयावर गंभीर आरोप करत ही माहिती तिथूनच लीक होत असल्याचा दावा केला आहे.
अंजली दमानिया यांनी खरातच्या संपर्कात असलेल्या विविध राजकीय नेत्यांच्या कॉल डिटेल्सबाबत माहिती देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नेत्या रुपाली चाकणकर यांच्याशी झालेल्या संवादाचे तपशील समोर आणले. त्यांनी कोणत्या नेत्याशी किती वेळा आणि किती वेळ संवाद झाला, याची सविस्तर माहिती मांडल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी या माहितीच्या स्त्रोतावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
राऊत यांनी माध्यमांशी बोलताना अंजली दमानिया या कोणत्याही गुप्तचर यंत्रणेच्या प्रमुख नसून त्यांच्याकडे इतकी संवेदनशील माहिती कशी पोहोचली, असा सवाल उपस्थित केला. अशी गोपनीय माहिती सामान्य व्यक्तीकडे येणे शक्य नसून ती मुख्यमंत्री कार्यालयातूनच पुरवली जात असल्याचा त्यांचा आरोप आहे. त्यांनी पुढे असेही म्हटले की, या माध्यमातून सरकारमधील कोणीतरी लक्ष्यावर आहे आणि ही माहिती जाणीवपूर्वक बाहेर आणली जात आहे.
सरकारच्या निशाण्यावर नेमके कोण आहेत, याबाबत लवकरच स्पष्ट होईल, असेही राऊत यांनी सूचक वक्तव्य केले. बाह्य माध्यमांद्वारे गोपनीय माहिती प्रसिद्ध होत असेल तर त्याचा अर्थ सरकारमधीलच काहीजण लक्ष्य केले जात आहेत, असा खळबळजनक दावा त्यांनी केला. स्वकीय आणि मित्रपक्षातील नेतेही या घडामोडींमध्ये निशाण्यावर असू शकतात, असे संकेत त्यांनी दिले.
Sunetra pawar : राष्ट्रवादीत नवा राजकीय पेच; सुनेत्रा पवारांच्या पत्रामुळे पार्थ पवार अडचणीत !
दरम्यान, अशोक खरात प्रकरणात महिलांवर अत्याचार, फसवणूक आणि राजकीय संपर्क यासंबंधीचे विविध पैलू समोर येत असून तपास यंत्रणा या सर्व बाबींचा सखोल तपास करत आहेत. या प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापले असून आगामी काळात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.








