Ashish Shelar-Rajeev Shukla surrounded made congratulate : आशिष शेलार-राजीव शुक्लांनी घेरलं; अभिनंदन करायला लावलं
Mumbai : दुबईत झालेल्या आशियाई क्रिकेट कौन्सिलच्या बैठकीत काल भारत-पाकिस्तान वाद पुन्हा पेटला. आशिया चषक 2025 मध्ये भारताने पाकिस्तानचा पराभव करत नवव्यांदा विजेतेपद पटकावलं. मात्र भारतीय संघाने पाकिस्तानचे मंत्री आणि एसीसी अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिल्यानं आधीच तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. आता एसीसीच्या बैठकीत त्यावरून चांगलाच राडा झाला.
बैठकीला बीसीसीआयकडून राजीव शुक्ला आणि आशिष शेलार ऑनलाइन उपस्थित होते. यावेळी मोहसीन नक्वीने आपल्या अध्यक्षीय भाषणात भारतीय संघाचं अभिनंदन करण्याचं टाळलं. त्यावर आशिष शेलार यांनी आक्षेप घेत नक्वीला जाब विचारला. या दबावानंतरच नक्वीने भारतीय संघाचं अभिनंदन केलं, अशी माहिती समोर येत आहे.
याशिवाय आशिया चषकाच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात झालेल्या गोंधळाबाबत आणि भारतीय संघाला सन्मानानं ट्रॉफी मिळण्याबाबत समाधानकारक उत्तर न दिल्यानं राजीव शुक्ला आणि आशिष शेलार यांनी बैठकीतून सभात्याग केला.
बैठकीत झालेल्या चकमकीत राजीव शुक्ला यांनी नक्वीला थेट सुनावलं “ही ट्रॉफी आमची आहे, तुम्ही ती कशी ठेवू शकता? आणि ती आशियाई क्रिकेट परिषदेकडे का नाही सादर केली गेली?” असा सवाल शुक्लांनी केला.
नक्वीने त्यावर उत्तर देताना म्हटलं “मला अनधिकृत सूत्रांकडून सांगण्यात आलं होतं की भारत जिंकल्यास संघ माझ्याकडून ट्रॉफी घेईल. जर मला माहित असतं की असं होणार नाही, तर मी येथे आलोच नसतो.”
यावर शुक्लांनी प्रत्युत्तर दिलं “कोणते अनधिकृत सूत्र? सुरुवातीपासूनच आमची भूमिका स्पष्ट होती. भारतीय संघ तुमच्याकडून ट्रॉफी स्वीकारणार नाही. तुम्ही थेट आम्हाला विचारायला हवे होते.”यानंतर नक्वीने विषय थंड करत, “मी याबद्दल तुमच्याशी स्वतंत्रपणे बोलेन, जेणेकरून तोडगा निघेल,” असं सांगितलं.
या सर्व घडामोडींमुळे आशियाई क्रिकेट कौन्सिलच्या बैठकीत भारत-पाकिस्तान दरम्यानचं राजकारण पुन्हा ठळकपणे समोर आलं.








