Jayant Patil’s all-out criticism of the government while speaking on the final week proposal : अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना जयंत पाटलांची सरकारवर चौफेर टिका
सरकारने शंभरी गाठली आहे. १०० दिवसांनंतर व्हिजनरी डॉक्यूमेंट आणू, असे सांगणाऱ्या सरकारला पूर्णपणे अपयश आले आहे. महिलांवरील अत्याचार, भ्रष्टाचार, वाचाळविरांची विधानं, दंगली, बिडमध्ये झालेले हत्याकांड. याच्यापलिकडे १०० दिवसांत काहीही झालेले नाही. दुसऱ्या बाजुला सुनीता विलीयम्स पृथ्वीवर आल्या. जग किती पुढे चाललंय, AIचा अविष्कार झाला आणि आपण कबर खोदायच्या मागे लागलेलो आहोत, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी आज (२४ मार्च) सरकारवर चौफेर टिका केली.
अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना पाटील म्हणाले, बेरोजगारी, महागाई, बेकारी यांमुळे सामान्य माणसाचे पूर्णपणे कंबरडे मोडले आहे. पण त्याला आवाज राहिला नाही. सत्तेवर येण्यापूर्वी जेवढी आश्वासने दिली, त्यातील एकही सहकारने पूर्ण केलेले नाही. यासाठी नामदेवराव ढसाळांनी लिहीलेली कविता अत्यंत बोलकी आहे. ‘माणूसपणाच्या चिंधड्या उडवणाऱ्या या रस्यावर मी शोधतेय माणूस, माझ्या रक्तात उष्ण आहे. त्याच्या दुखाचा रंग, त्याच्या वेदनाचा आवाज मी माझ्या हाडांमद्ये ऐकतो, कुठे हरवली माणूसकी?. हे ७०व्या दशकात लिहिलेले शब्द आहेत आणि आजही तंतोतंत खरे ठरतात. सेंसॉर बोर्डाचा अधिकारी विचारतो, कोण लक्ष्मण ढसाळ? अशा अधिकाऱ्याला आतमध्ये टाका. त्याला ढसाळांचे साहित्य वाचायला द्या, अन् मग बाहेर काढा, अशी मागणी जयंत पाटील यांनी केली.
सोमनाथ सूर्यवंशीचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला. पोलिसांनी सांगितले की हार्ट अटॅकने मृत्यू झाला. पोलिसच त्याच्या मृत्युला जबाबदार आहेत, असे न्यायालयाने सांगितले. हा अहवाल सरकारने विधीमंडळात मांडला पाहिजे. तीन पोलिस निलंबित झाले म्हणजे सोमनाथला न्याय मिळाला, असे होत नाही. सोमनाथला कोठडीत मारण्याचे आदेश ज्यांनी दिले, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी जयंत पाटील यांनी केली. सभागृह परवा संपत आहे. त्यापूर्वी सोमनाथला न्याय मिळाला पाहिजे, असेही ते म्हणाले.
बीड जिल्ह्यात संतोष देशमुखची हत्या झाली. सभागृहात ३० ते ४० सेकंदाचं निवेदन झालं. दोन महिने उलूटन केले. तरी सर्व आरोपींना पोलिसांना पकडता आले नाही. अजूनही एक जण बाहेर आहे. त्याला सोयीस्कर बाहेर ठेऊन चार्जशीट चुकीच्या दिशेने गेली तर जबाबदार कोण, असा प्रश्न त्यांनी केला. यापुढे असे प्रकार होणार नाही, यासाठी सरकार काय करणार, यावर सत्ताधाऱ्यांतून कुणी बोलले नाही, असंही ते म्हणाले.
लातुर जिल्ह्यात सैराट सिनेमासारखे प्रकरण घडले. टाकळी गावातील माऊली उमेश सोट हा १८ वर्षाचा तरूण एका मुलीवर प्रेम करायचा. आयटीआय शिकलेला होता. त्याला पूर्णपणे संपवले. कशामुळे झाले, तर लोकांना त्याची जात खटकली. आपल्यातला माणूस मेला, का समाज व्हायलंट झाला? गुन्हे का वाढले? समाज क्रूर व्हायला लागला आहे. लोकांना कायद्याचा धाक राहिलेला नाही. इस्लामपूरला पीआय बदलावा म्हणून भाजपचे आंदोलन सुरू आहे. हे काय चाललंय महाराष्ट्रात, असाही प्रश्न पाटील यांनी उपस्थित केला.
बसमध्ये, रेल्वेत बलात्कार होत आहेत. अन् मुख्यमंत्री सांगतात की कायदा व सुव्यवस्था उत्तम आहे. मंत्रालयात प्रवेश करण्यावर निर्बंध लावले आहेत. सामान्य माणसाला चार चार तास रांगा लावाव्या लागतात. मोठा ठेकेदार आल्यास त्याला गाडीसह थ्रू पास दिला जातो. आपण म्हणतो संतांची भूमी आहे. पण जिल्हा सुशासन निर्देशांक घसरला आहे. ३६ पैकी २२ जिल्ह्यांमध्ये गुन्हेगारी रोखण्यात अपयश आले असल्याचेही जयंत पाटील यांनी सभागृहाला सांगितले.