sanjay-raut-on-harshvardhan-sapkal-chandrapur-mayor-rahul-gandhi-rajya-sabha : राज्यसभा व राहुल गांधी प्रकरणावरही स्पष्ट भूमिका
Mumbai : चंद्रपूर महापालिकेतील सत्तास्थापनेवरून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना थेट प्रत्युत्तर दिले आहे. “चंद्रपूरमध्ये शिवसेना ठाकरे गटामुळे आमचा महापौर होऊ शकला नाही,” असा आरोप सपकाळ यांनी केला होता. यावर प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले की, “हे पूर्णपणे चुकीचे आहे. तुमच्या आपापसातील गटबाजीमुळे तुम्ही महापौरपद गमावले. आम्ही तुमच्या सोबतच होतो.”
राऊत यांनी पुढे सांगितले की, त्यांच्या माहितीनुसार दिल्लीमध्ये काँग्रेसच्या दोन्ही गटांना समज देण्यासाठी उच्च पातळीवर बैठकही झाली होती. मात्र अंतर्गत मतभेद मिटवता आले नाहीत आणि त्याचा परिणाम चंद्रपूरमधील राजकारणावर झाला.
Donald trump : इतर देशांवर १० टक्के, भारतावर १८ टक्के टॅरिफ कायम
दरम्यान, भिवंडी न्यायालयात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात दाखल अवमान याचिकेबाबतही राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. नव्याने जामीनदार देण्यासाठी राहुल गांधी न्यायालयात हजर राहणार असल्याच्या पार्श्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राऊत म्हणाले की, “राहुल गांधी किंवा संजय राऊत यांनी काही विधानं केली तर सरकारचा अवमान होतो, त्याचा आम्हाला अभिमान आहे.”
राज्यसभा निवडणूक २०२६ संदर्भातही राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. सात जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडीतून कोणाला उमेदवारी द्यायची, यावर राजकीय चुरस वाढली आहे. राऊत यांनी यापूर्वी शरद पवार यांनी राज्यसभेत जावे, अशी भूमिका मांडली होती. तर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ही जागा शिवसेना ठाकरे गटालाच मिळावी, असा दावा केला आहे.
या पार्श्वभूमीवर मालेगाव येथे माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले की, “मी पक्षाच्या निर्णयाशी कायम बांधील आहे. उद्धव ठाकरे यांनी पक्षातून कोणाला उमेदवारी दिली तर त्यांना निवडून आणणे हे आमचे कर्तव्य आहे. शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याने इच्छा व्यक्त केली तर त्यावर चर्चा होऊ शकते, इतकेच मी म्हटले. मी कोणाचे नाव अधिकृतपणे घेतलेले नाही.”
Mahayuti Government : बारामतीसाठी स्वतंत्र अतिरिक्त जिल्हाधिकारी; प्रशासकीय निर्णयप्रक्रियेला वेग
दोन राष्ट्रवादी गट एकत्र आल्यास भविष्यात अडचणी निर्माण होऊ शकतात, त्यामुळे प्रियांका चतुर्वेदी यांनाच पुन्हा संधी द्यावी, असे आदित्य ठाकरे यांनी सुचवले होते. यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की, “त्यांचे म्हणणे योग्य आहे. आदित्य ठाकरे मोठे नेते आहेत. त्यांनी जे सांगितले आहे, त्याचा महाराष्ट्राने विचार केला पाहिजे.”
चंद्रपूरपासून राज्यसभेपर्यंत विविध मुद्द्यांवर राऊत यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीत सुरू असलेल्या अंतर्गत हालचालींना नवे राजकीय वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
___








