Tribal health needs advanced treatment : सौनिक म्हणाल्या, ‘जैवविविधता टिकविण्यात आदिवासींचे मोलाचे योगदान’
Nagpur जैव विविधता, पर्यावरण आणि निसर्गपूरक राहणीमान याचे उपजत मूल्य व ज्ञान आदिवासींनी टिकवून ठेवले आहे. निसर्गाला बाधा न पोहचवता अनेक अशा वनोषौधीच्या साहाय्याने निसर्गोपचाराचा एक शाश्वत मार्ग त्यांच्या ज्ञानातून आपल्याला मिळाला आहे. पण आता आदिवासींचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी त्यांना प्रगत उपचार उपलब्ध करून देण्याची गरज आहे, असे मत राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी व्यक्त केले.
दूर्गम भागातील आदिवासींच्या आरोग्याला अधिक सक्षम करण्यासाठी गरज आहे. त्यासाठी त्यांच्या उपचार पद्धतीला नविन वैद्यकीय सेवासुविधा, तंत्रज्ञान व उपचाराची जोड देणे आवश्यक आहे. यादृष्टीने एम्स येथील आदिवासींचा आरोग्य विषयावर आयोजित करण्यात आलेली ही जागतिक आरोग्य परिषद महत्त्वपूर्ण आहे, असंही त्या म्हणाल्या.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ व आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एम्स’ नागपूर येथे आयोजित परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त), ‘एम्स’ नागपूरचे संचालक डॉ. प्रशांत जोशी, डॉ. मिलिंद निकुंभ, परिषदेचे संयोजक डॉ. संजीव चौधरी, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
आपण कितीही प्रगती केली तरी या उपजत निसर्गमूल्यांना आपल्याला डावलता येणार नाही. प्रगत वैद्यकीय सेवासुविधा आवश्यक त्या प्रमाणात काही दूर्गम भागात न पोहोचताही तेथील आदिवासींनी आपल्या उपजत ज्ञानावर आरोग्याला समजून घेतले आहे. त्यांच्या या ज्ञानाला जोड देवून नविन आरोग्य सुविधेच्या माध्यमातून सक्षमीकरणाची गरज आहे. शासन यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्नशील आहे, असं सौनिक म्हणाल्या.
आदिवासींच्या आरोग्य विषयक समस्या सोडविण्यासाठी शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांमध्ये आशा वर्कर, आरोग्य सेवक यांच्याकडून आरोग्य विषयक माहिती प्राप्त होते. ‘जागतिक आरोग्य संघटने’च्या मानकांनुसार याला विद्यापीठाच्या ‘ब्लॉसम’ प्रकल्पाअंतर्गत प्रत्यक्ष आरोग्य सेवेविषयी काम करुन मिळालेली माहिती आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.








