Breaking

CM Devendra Fadnavis : हिरव्या रंगाची चादर जाळल्याचा अपप्रचार

 

Compensation will be recovered from the rioters : मुख्यमंत्री फडणवीस यांचा दावा; दंगेखोरांकडून नुकसान भरपाई वसूल करणार

कुराणातील आयात असलेली हिरव्या रंगाची चादर जाळल्यावरून दंगल उसळली असे बोलले जात आहे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा दावा खोटा असल्याचे म्हटले आहे. दंगलीनंतर प्रथमच ते नागपुरात आले. पोलीस आयुक्त व अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी हिरवी चादर जाळल्याचा खोटा प्रचार केला जात असल्याचा दावा त्यांनी केला.

दंगलखोरांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना दिले. ‘नागपूर हे धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जाते. या शहराची वेगळी संस्कृती आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, अशा प्रकारच्या घटना बरेच वर्षानंतर पहिल्यांदाच घडली आहे. भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडणार नाही यादृष्टीने शांतता भंग करणाऱ्या दंगलखोरांविरुद्ध अत्यंत कठोर कारवाई करा,’ असे निर्देश फडणवीस यांनी दिलेत.

नागपूर शहरातील कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरिष्ठ पोलीस अधिकारी, जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत शहरात घडलेल्या घटनेसंदर्भात आढावा घेतला. पोलीस आयुक्तालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पोलीस आयुक्त डॉ.रविंद्र सिंगल आदी उपस्थित होते.

CM Devendra Fadnavis : दंगलीतील आरोपी दंगलीचे ‘सत्य’ कसे शोधणार?

दंगलीमध्ये दगडफेक झाल्यामुळे 34 पोलीस जखमी झाले आहेत. 71 वाहनांचे तसेच विविध मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानी संदर्भात जिल्हा प्रशासनाने पंचनामे सुरु केले आहे. वाहनांच्या नुकसानी संदर्भात विमा कंपन्यांना आवश्यक असलेले दस्ताऐवज उपलब्ध करुन देण्यासबंधी तत्काळ कारवाई करावी, अशी सूचना यावेळी केली.

मुख्यमंत्री म्हणाले की, औरंगजेबासंदर्भात दुपारी आंदोलन करणाऱ्यांविरुद्ध पोलीसांनी कारवाई केल्यानंतरही समाजकटंकांकडून सायंकाळी दंगा भडकविण्यात आला. दंगलखोरांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस विभागाने तत्काळ कारवाई करुन दंगल आटोक्यात आणली. परंतु या दंगलीमध्ये मोठ्या प्रमाणात वाहनांची जाळपोळ व संपत्तीचे नुकसान झाले आहे.

शहराच्या अकरा पोलीस स्टेशनच्या परिसरात जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहे. या संदर्भात 13 गुन्हे दाखल झाले असून 104 आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी 12 विधी संघर्ष बालक आहेत. शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे तसेच जनतेकडून प्राप्त झालेल्या कव्हरेज (Video Clip) च्या आधारे दंगलखोरांना शोधून त्यांच्याविरुद्ध कडक कारवाईचा सूचना देण्यात आल्या आहेत, असं मुख्यमंत्री म्हणाले.

Devendra Fadnavis : मोदींच्या भेटीसाठी फडणवीस दिल्लीत, शिंदे गट अस्वस्थ

दंगल भडकविण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या विविध समाज माध्यमांवरील पोस्टची तपासणी करुन अशा प्रकारच्या 250 पोस्ट शोधण्यात आल्या आहेत. या पोस्ट टाकणाऱ्या 62 लोकांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तर दोन लोकांना अटक करण्यात आली आहे. अशा पोस्ट टाकणारे व शेअर करणाऱ्यांविरुद्ध दंगल भडकविल्याबद्दल सहआरोपी करण्याचे निर्देश यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.

दंगलीमध्ये मालमत्तेचे तसेच वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत. नुकसानीसंदर्भात पंचनामे करुन येत्या तीन ते चार दिवसात नुकसान भरपाई देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या.