Unlimited opportunities due to infrastructure Chief Minister : पायाभूत सुविधांमुळे अमर्याद संधी – मुख्यमंत्री
Mumbai : राज्यात पायाभूत सुविधांच्या विकासामुळे आणि उद्योगधोरणातील सुधारणा यामुळे महाराष्ट्र देशाच्या विकासकेंद्राच्या दिशेने वाटचाल करत आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. सह्याद्री अतिथीगृह येथे ‘२०-२० गुंतवणूक संघटने’च्या शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या वेळी उद्योग मंत्री उदय सामंत, राज्यमंत्री इंद्रनील नाईक आणि संघटनेचे अध्यक्ष वेरा ट्रोजन उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा उभारल्या जात आहेत. नवीन उद्योग सहज आणि कमी कालावधीत सुरू करण्यासाठी शासनाने अनेक धोरणात्मक सुधारणा केल्या आहेत. त्यामुळे राज्यात गुंतवणुकीच्या अमर्याद संधी उपलब्ध आहेत. गुंतवणूकदारांनी महाराष्ट्रात अधिकाधिक गुंतवणूक करावी.”
ते म्हणाले, “धोरणात्मक सुधारणा आणि पायाभूत विकासामुळे महाराष्ट्र देशाचे ‘ग्रोथ सेंटर’ बनले आहे. देशाच्या एकूण डेटा क्षमतेपैकी ६० टक्के क्षमता महाराष्ट्रात आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून, ती मनोरंजन आणि स्टार्टअपची राजधानीही बनली आहे. त्यामुळे महाराष्ट्र गुंतवणुकीसाठी देशातील ‘मॅग्नेट’ ठरत आहे.”
राज्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले. “भूजल पातळी वाढविण्यासाठी जलयुक्त शिवार ही लोकसहभागातून राबविलेली मोहीम अत्यंत यशस्वी ठरली. तिच्या टप्पा २ च्या अंमलबजावणीमुळे आतापर्यंत जवळपास २० हजार गावे दुष्काळमुक्त झाली आहेत. सिंचन सुविधेमुळे शेतकरी एकावरून दोन पिकांकडे वळला असून, फलोत्पादन लागवडही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे,” असे त्यांनी सांगितले.
Ramdas kadam : ‘बाळासाहेब माझं दैवत’ म्हणत कदमांनी घेतली माघार !
राज्यातील सिंचन प्रकल्पांबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, “वैनगंगा ते नळगंगा असा देशातील सर्वात मोठा नदीजोड प्रकल्प राबविण्यात येणार आहे. जवळपास ५०० किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पामुळे विदर्भ सुजलाम सुफलाम होईल. पश्चिम घाटातून समुद्रात जाणारे पाणी उपसा सिंचनाद्वारे गोदावरी खोऱ्यात आणून राज्य अधिकाधिक सिंचित केले जाईल.”
तसेच, कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील कौशल्य विकासावरही त्यांनी भर दिला. “राज्य शासन उद्योगवाढीबरोबरच प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्यासाठी कटिबद्ध आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे कौशल्य विकासाच्या माध्यमातून युवकांना नवीन रोजगाराच्या संधी मिळत आहेत. औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात आले आहे,” असे फडणवीस यांनी सांगितले.
या बैठकीत गुंतवणूक वाढविण्यासाठीच्या विविध प्रकल्पांवर सविस्तर चर्चा झाली. महाराष्ट्र हे गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम राज्य आहे, अशी हमी देत मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व गुंतवणूकदारांना महाराष्ट्राच्या विकासयात्रेत सहभागी होण्याचं आवाहन केलं.
____








