Several Villages in Motala Taluka Excluded : माेताळा तालुक्यातील अनेक गावांना वगळले; केवळ १२ गावांचाच समावेश
Motala अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याचा दावा राज्य शासन करीत असले तरी प्रत्यक्ष चित्र वेगळेच असल्याचे चित्र आहे. माेताळा तालुक्यातील अनेक गावांना अतिवृष्टीच्या मदतीतून वगळण्यात आल्याने थेट सत्ताधारी भाजपलाच निवेदन द्यावे लागले आहे.
सप्टेंबर महिन्यात माेताळा तालुक्यात माेठ्या प्रमाणात नुकसान झाले. नदी, नाल्यांना पूर आल्याने अनेक शेतकऱ्यांची पिके खरडून गेली. तसेच अनेकांच्या शेतात पाणी शिरल्याने पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले. तालुक्यातील जवळपास सर्वच गावांना फटका बसला असला तरी प्रशासनाने केवळ १२ गावातच नुकसान दाखविले आहे. वगळलेल्या सर्वच गावांचा समावेश करण्याची मागणी तालुका भाजपच्या वतीने तहसीलदार मोताळा यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
निवेदनात नमूद आहे की, राज्य सरकारने नुकतीच पुर व अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचा मोठा हात दिला आहे व त्यांची दिवाळी गोड केली आहे. जाहीर केलेल्या मदतीच्या यादीत बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्याचा समावेश झालेला आहे, मात्र तालुक्यातील फक्त बारा गावांचा समावेश करण्यात आलेला आहे .यामध्ये उबाळखेड, सोनबरड, नळकुंड, गुळभेली, शहापूर, राहेरा,दाभा, नाईक नगर, रोहिणखेड, वडगाव खंडोपंत, खामखेड व खडकी यांचा समावेश आहे.
मात्र प्रत्यक्षात मोताळा तालुका मोठ्या प्रमाणात बाधित असून अनेक गावे मदतीपासून वंचित ठेवेलेली आहे. शासनाने फक्त जिरायत पिकाखालील ३३ टक्यांपेक्षा जास्त नुकसान असलेल्या शेतकर्यांना मदत जाहीर केली आहे. यामध्ये या बारा गावांतील बाधित क्षेत्र २ हजार २४१ हेक्टर आर, एकूण शेतकरी ३१८३ , खरडून गेलेले क्षेत्र ५१ हेक्टर आर, खरडून शेतकरी संख्या ८८, तर विहीर नुकसान ४६ दाखविली आहे.








