Small countries rushed to assist India with fuel supply during the crisis : युद्ध संपलेले नाही, पण भारतात इंधनाचा पुरेसा साठा
Mumbai जगातील सुमारे २० टक्के कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूची आयात-निर्यात होर्मुज सामुद्रधुनी या मार्गाने होते. मात्र, इराणने हा मार्ग बंद केल्यामुळे जागतिक पातळीवर इंधन तुटवड्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्याचे पडसाद भारतातही उमटत असले तरी इतर देशांच्या तुलनेत त्याचा परिणाम तुलनेने कमी दिसून येत आहे. पेट्रोलियम मंत्रालयाच्या माहितीनुसार, गेल्या महिन्याच्या तुलनेत सध्याची परिस्थिती सुधारली असून देशात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे.
विशेष म्हणजे, या संकटाच्या काळात अनेक आफ्रिकी देश भारताच्या मदतीला पुढे सरसावले आहेत. होर्मुज सामुद्रधुनी बंद झाल्यानंतर भारताने इंधन आयातीच्या धोरणात बदल करत विविध पर्याय शोधले आहेत. भारत दररोज सुमारे ५.५ ते ५.६ दशलक्ष बॅरल कच्चे तेल आयात करतो. युद्ध सुरू होण्यापूर्वी यातील ४० ते ४५ टक्के हिस्सा होर्मुज सामुद्रधुनीतून येत होता. घरगुती गॅसच्या बाबतीत भारताची वार्षिक गरज सुमारे ३१ दशलक्ष टन इतकी आहे, ज्यातील मोठा भाग आयातीवर अवलंबून आहे. यापैकी सुमारे ९० टक्के गॅस याच मार्गाने भारतात येत होता, त्यामुळे हा मार्ग बंद होणे भारतासाठी मोठे आव्हान ठरले.
Chandrashekhar bawankule : महसूलमंत्री बावनकुळेंची फेसबुकवरून बदनामी; कोराडीत गुन्हा दाखल!
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, घरगुती गॅससाठी भारताने अमेरिका, रशिया, कॅनडा, नॉर्वे तसेच पश्चिम आफ्रिकेतील नायजेरिया, अल्जेरिया, घाना, काँगो आणि अंगोला या देशांशी संपर्क साधला आहे. यापैकी काही देशांकडून पुरवठा सुरूही झाला आहे. तसेच नैसर्गिक गॅससाठी कॅमरून, इक्वेटोरियल गिनी आणि मोझांबिक या देशांशीही संपर्क साधण्यात आला आहे.
दरम्यान, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरात हे देश होर्मुज मार्गाला वळसा घालणाऱ्या पाइपलाइनद्वारे इंधनाचा पुरवठा करत आहेत. सौदी अरेबियाकडून पूर्व-पश्चिम पाइपलाइन आणि यूएईकडून हबशान-फुजैराह पाइपलाइन भारतासाठी वरदान ठरली आहे. यामुळे भारताला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.








