Sanjay Raut’s letter to Amit Shah; creates a stir in political circles : संजय राऊतांचं अमित शाहांना पत्र; राजकीय वर्तुळात खळबळ
New Delhi : माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड राजीनामा दिल्यानंतर अचानक सार्वजनिक जीवनातून गायब झाल्याच्या चर्चेला राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. धनखड यांच्या आरोग्याबाबत आणि ठिकाणाबाबत अनिश्चितता निर्माण झाल्याने विरोधकांनी मोदी सरकारवर थेट निशाणा साधला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे चे खासदार संजय राऊत यांनी यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना थेट पत्र लिहून तातडीने माहिती देण्याची मागणी केली आहे.
२१ जुलै रोजी संसद अधिवेशनादरम्यान राज्यसभेचे कामकाज अचानक स्थगित करण्यात आले. त्यावेळी सभापती धनखड यांच्या प्रकृती अस्वास्थ्याचे कारण सांगण्यात आले. मात्र त्यानंतर ते सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये दिसलेले नाहीत. या परिस्थितीमुळे त्यांच्या सुरक्षिततेबाबत आणि आरोग्याबाबत विविध अफवा पसरल्या आहेत.
Janakpurush Aandolan : महाराष्ट्रात ठाकरे गटाचे जनआक्रोश आंदोलन
अमित शाह यांना लिहिलेल्या पत्रात राऊत म्हणतात, “मी हे पत्र अत्यंत गंभीर आणि चिंतेच्या परिस्थितीत लिहित आहे. माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या सुरक्षिततेबाबत व आरोग्याबाबत गेल्या काही दिवसांपासून अफवा पसरत आहेत. आम्ही सर्वजण चिंतीत आहोत. त्यांच्या ठिकाणाची आणि प्रकृतीची तातडीने अधिकृत माहिती देशासमोर यावी, ही अपेक्षा आहे.”राऊत यांनी यापूर्वीही धनखड यांच्या अचानक गायब होण्याबाबत प्रश्न उपस्थित केले होते. त्यांनी आरोप केला की, “विरोधकांना गायब करण्याची पद्धत चीन आणि रशियासारख्या देशांमध्ये असते, मात्र आता भारतातही तीच पद्धत सुरू झाली आहे.”
धनखड यांच्यावरील या चर्चेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी ‘लापता लेडीज’ चित्रपटाची आठवण काढली, तर राऊतांनी थेट मोदी सरकारवर विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. राजस्थानमध्ये धनखड यांचं समर्थन करणाऱ्या भाजप प्रवक्त्याला पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आल्यानंतर हा वाद आणखी गडद झाला आहे.सध्या या प्रकरणामुळे दिल्लीपासून मुंबईपर्यंत राजकीय वातावरण तापले असून, धनखड यांच्याबाबतची अधिकृत माहिती आणि स्पष्टीकरणाची सर्वत्र मागणी होत आहे.