Jayant Patil slams Chief Minister Devendra Fadnavis over Nagpur riots : नागपूर दंगलप्रकरणी जयंत पाटलांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर सडकून टिका
Mumbai : निवडणूक झाली, सर्व जिकडचं तिकडं झालं. ज्यांना पराभूत करायचं, त्यांना तुम्ही केलं. पण सरकार तरी नीट चालवा ना, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना दिला. ते म्हणाले, २०२४ मध्ये ५९ जातीय दंगली झाल्या. त्यातील १२ महाराष्ट्रात झाल्या.
२०२२पासून महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेशात दंगलींमध्ये सातत्याने वाढ झाली. १२ दंगली महाराष्ट्रात, गुजरातमध्ये ५, मध्यप्रदेशात ५ आणि राजस्थानमध्ये ३ दंगली झाल्या. का होतात या दंगली? कशा होतात? दंगलींमध्ये महाराष्ट्राचाआकडा वर जातोय म्हणजे आपण खाली किती अस्वस्थता निर्माण केली, हे तपासण्याची वेळ आली असल्याचेही पाटील म्हणाले.
कट पकडता आला तरच पोलिस ना..
अमरावती परिसरात दंगल झाली. नंतर परवा परवा नागपुरात दंगल उसळली.
नागपूरची दंगल पूर्वनियोजित कट होता, असे खुद्द मुख्यमंत्र्यांनीच सांगितले. मग पूर्वनियोजित कट होता तर तुम्ही काय हजामती करत होता काय, असा तिखट सवाल जयंत पाटील यांनी केला. पूर्वनियोजित कट म्हणजे प्लॅनिंग आहे. प्लॅनिंग केलं तर कुठेतरी सिटींग झाली असेल. बसले असतील ना कुठेतरी…? मग पोलिस काय करत होते. पोलिस खात्याला पूर्वनियोजित कट पकडता आला तर ते पोलिस खातं ना.., असे म्हणत जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शरसंधान साधले.
त्यांचा सत्कारच करायला पाहिजे..
यासंदर्भात अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना जयंत पाटील म्हणाले, सर्वात शांत प्रवृत्तीची लोक नागपुरात राहतात आणि तेथे दंगल घडवून दाखवली म्हणजे त्यांचे कौतुक आहे. त्यांनी टॉपचं स्कील वापरलं. त्यांचा सत्कारच करायला पाहिजे. ज्याप्रमाणे त्यांनी लोकांच्या भावनांशी खेळ केला, तो कौतुकास्पद आहे. म्हणून आता सरकारने अशा गोष्टींकडे जास्त ठामपणाने लक्ष द्यायला पाहिजे.
..तर दावोसची गुंतवणूक दुसऱ्या राज्यात जाणार..
सरकराला चालतंय असा एक अप्रत्यक्ष मेसेज गेला. सरकारमध्ये बसलेले वेळेनुसार वेगवेगळ्या भूमिका घेत असतात. त्यामुळे असं कृत्य करणाऱ्यांना वाटतं की सरकारची संमती आहे. किमान सरकारमध्ये बसणाऱ्यांनी तरी त्याचं उदात्तीकरण करू नये. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी. पण समाज जिवन उद्धवस्त केलं तर शिल्लक राहिल काय, याचाही विचार सत्ताधाऱ्यांनी करायला हवा. दावोसला जाऊन कोट्यवधींची गुंतवणूक आणल्याचा दावा सत्ताधाऱ्यांनी केला, हे असंच सुरू राहिलं तर ती गुंतवणूक दुसऱ्या राज्यात जाण्यास वेळ लागणार नाही, अशी भीती जयंत पाटील यांनी व्यक्त केली.