Balya Borkar’s bullying, yet crimes are committed against Congress workers : भाजपचे माजी नगरसेवक नरेंद्र – बाल्या बोरकर यांनी सर्व आरोप फेटाळले
Nagpur : बिडगांव नगरपंचायत निवडणुकीत मोठ्या प्रमाणात बोगस मतदान घडवून आणण्याचा प्रयत्न भाजपने केला, असा गंभीर आरोप काँग्रेस नेत्या आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अवंतिका लेकुरवाळे यांनी पत्रकार परिषदेत केला. भाजपचे माजी नगरसेवक बाल्या उर्फ नरेंद्र बोरकर यांनी मतदान केंद्रात घुसून दमदाटी केल्यामुळेच परिस्थिती बिघडली, पण बोगस मतदान थांबवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवरच गुन्हे दाखल करण्यात आल्याचाही आरोप त्यांनी केला.
लेकुरवाळे म्हणाल्या की, २ डिसेंबरला काँग्रेसने प्रत्येक बूथवर सैनिकाप्रमाणे पहारा ठेवत भाजपचा बोगस मतदानाचा डाव उधळून लावला. वॉर्ड क्र. सहामध्ये भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांमधून आणले गेलेले अनेक बाहेरील मतदार आम्ही परत पाठवले. हेच भाजपला मान्य नव्हते, असे त्यांनी सांगितले.
त्यांच्या मते, बिडगांवमध्ये तीन हजार ते पाच हजार बोगस मतदार घुसवले गेले होते. काँग्रेसने ऑक्टोबरमध्ये निवडणूक अधिकाऱ्यांकडे हजारो आक्षेप दिले, पुरावे दिले; मात्र प्रशासनाने दबावाखाली कोणतीही कारवाई केली नाही, यादी दुरुस्त केली नाही, असा आरोपही त्यांनी केला.
मतदान केंद्रातील तणावाची घटनांची माहिती देताना लेकुरवाळे म्हणाल्या, भाजप पदाधिकारी निहाल चिकाटे यांच्या मुलाने तीन वेगवेगळ्या याद्यांमध्ये नाव असताना दोन ठिकाणी मतदान केले. वॉर्ड क्रमांक सहामधील मतदार चंद्रकला, किशोर, आदित्य बिसने हे भंडारा जिल्ह्यातील रहिवासी असूनही मतदानाला आले, त्यांना काँग्रेसने रोखले. यानंतर बाल्या बोरकर केंद्रात धडकले आणि अधिकारी व प्रतिनिधींना रंगदारी उतरवून देतो, असे म्हणत धमकावले.
बोगस मतदारांचे ओळखपत्र न पाहता मतदान करू दिल्याचे सीओ व निवडणूक अधिकाऱ्यांनी मान्य केले, असा दावा लेकुरवाळे यांनी केला. लेकुरवाळे पुढे म्हणाल्या, बोगस मतदानाविरोधात आवाज उठवल्याबद्दल आमच्यावरच १८९, १९० सारखे कलम लावले. पण आम्हाला अटकेची भीती नाही. सत्यासाठी लढत आहोत. भाजपचे पदाधिकारी, अधिकारी आणि बोगस मतदान करवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, ही आमची मागणी आहे.
निवडणूक प्रशासनाने जूनमध्ये दिलेल्या चार हजार ७०० बोगस मतदारांच्या यादीवरही चौकशी न केल्याचा आरोप त्यांनी पुन्हा केला. बिडगांवमध्ये प्रत्येक केंद्रावर काँग्रेसकडून ओळखपत्र तपासणीची मागणी करण्यात आली; परंतु प्रशासन सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करत आहे. मतदान केंद्रावर पोहोचलेल्या काँग्रेस उमेदवार छाया व बबिता गौतम यांना पोलिसांनी बाहेर ढकलल्याचा आरोप करत, लोकशाहीला तडीपार करण्याचा भाजपचा कट आम्ही थांबवला, असे लेकुरवाळे म्हणाल्या.
Indigo crisis : इंडिगो संकट कायम ‘हाहा:कार सुरूच’ प्रवाशांचा संताप वाढला
दरम्यान, या सर्व आरोपांवर प्रतिक्रिया व्यक्त करताना भाजपचे माजी नगरसेवक नरेंद्र बोरकर यांनी सर्व आरोप फेटाळले. मी बिडगांवला गेलो होतो, पण आरोप सर्व खोटे आहेत. त्यांना काम नाही, आम्हाला खूप कामे आहेत,” असे बोरकरांनी स्पष्ट केले. ही संपूर्ण निवडणूक भाजप–काँग्रेस संघर्षाने तापलेली असून, बोगस मतदानाचा मुद्दा पुढील काही दिवस राजकीय वादग्रस्त चर्चेचा ठरण्याची चिन्हे आहेत.








