Maharashtra politics : देवेंद्र फडणवीसांचा रात्रीचा गुप्त दिल्ली दौरा, पहाटे मुंबईत परतले!

sunetra-pawar-meet-narendra-modi-amit-shah-devendra-fadnavis-delhi-visit : आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्लीला रवाना, राजकीय हालचालींना वेग

Mumbai: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी रात्री अचानक दिल्ली गाठल्याने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता फडणवीसांनी रात्री उशिरा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली आणि आज पहाटेच ते मुंबईत परतले. राज्यातील सध्याच्या घडामोडी, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे निकाल तसेच आगामी राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा हा गुप्त दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

राज्यात पुढील काही दिवसांत मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याचे संकेत मिळत असतानाच देवेंद्र फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्याने त्या चर्चांना अधिकच बळ मिळालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत हालचाली सुरू असल्याची चर्चा असून, यासंदर्भात सत्ताधारी महायुतीतील मित्रपक्षांशी अंतर्गत चर्चा सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा दिल्ली दौरा केवळ औपचारिक नसून, त्यामागे महत्त्वाचे राजकीय संकेत दडले असल्याचं बोललं जात आहे.

Tri language policy : त्रिभाषा धोरण समितीचा अहवाल शासनाकडे सादर

देवेंद्र फडणवीसांच्या दौऱ्यानंतर आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देखील दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेतल्यानंतर त्या आज सायंकाळी 6.45 वाजता दिल्लीसाठी रवाना होणार आहेत. मंगळवारी त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे. ही भेट सदिच्छा स्वरूपाची असल्याचं अधिकृतपणे सांगण्यात येत असलं तरी, मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली भेटीनंतर लगेचच सुनेत्रा पवारांचा दौरा होत असल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

या दिल्ली दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल हेही सुनेत्रा पवारांसोबत असणार आहेत. त्यामुळे ही भेट केवळ औपचारिक न राहता, आगामी राजकीय वाटचालीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरू शकते, अशी चर्चा सुरू आहे.

दरम्यान, नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये अजित पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात दुसऱ्या क्रमांकावर राहिली आहे. 12 जिल्हा परिषदांपैकी भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असून महायुतीने एकूण 731 पैकी 562 जागा जिंकत ग्रामीण महाराष्ट्रात आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे. या निकालांनंतर सत्ताधारी महायुतीचा आत्मविश्वास वाढला असून, त्याच पार्श्वभूमीवर दिल्लीत घडणाऱ्या हालचालींकडे राजकीय निरीक्षकांचं लक्ष लागून राहिलं आहे.

ZP Election Results : भाजप ठरला राज्यात अव्वल, अजित पवारांची राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा अचानक झालेला दिल्ली दौरा आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची राजधानीकडे होणारी वाटचाल, या घडामोडींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात लवकरच मोठे निर्णय आणि बदल पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.