Farmers’ cotton did not get the right price : संकटांचा सामना करत कापूस बाजारपेठेत
Wardha विदर्भाची ओळख संपूर्ण देशात शेतकरी आत्महत्यांसाठी आहे. विदर्भात आतापर्यंत हजारो शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. या आत्महत्यांच्या केंद्रस्थानी कर्जबाजारीपणा होता. सरकारने अनेक उपाययोजना केल्या. कर्जमुक्ती करण्याचा प्रयत्न केला. पण तरीही आत्महत्या थांबल्या नाहीत. शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव, हा एकमेव उपाय असल्याचे बोलले गेले. पण दुर्दैवाने आजही त्याचा गांभिर्याने विचार होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा सर्व संकटांचा सामना करत कापूस बाजारात आणला आहे. सरकारने पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या खिशाला कात्री लावली आहे.
विदर्भात सर्वाधिक कापसाचे उत्पादन वर्धा जिल्ह्यात घेतले जाते. तसेच हे नगदी पीक असल्याने याला पांढरे सोने म्हणून ओळखले जाते. पण पिवळ्या सोन्याच्या तुलनेत याचा भाव घसरला आहे. गेल्या पाच ते सहा वर्षांपासून कापसाचे भाव ६ हजार ते ७ हजाराच्या दरम्यान आहेत. यंदा उत्पादनात घट आली. यामुळे चांगला भाव मिळेल, अशी अपेक्षा होती. पण सरकारच्या धोरणामुळे उत्पादन खर्चानुसार भाव मिळाला नाही.
शेतकऱ्यांच्या खिशाला पुन्हा कात्री लावण्यात आली. आता बँकेच्या कर्जाची परतफेड, उसनवारी, कौटुंबिक खर्च अशा अनेक अडचणी दूर करण्यासाठी अखेर पांढरे सोने बाजारपेठेत विक्रीसाठी न्यावे लागत आहे. यामुळे यंदाही आर्थिक झळ सोसावी लागणार आहे.
शेतकऱ्यांना दरवर्षी अस्मानी आणि सुलतानी संकटाचा सामना करावा लागतो. निसर्ग साथ देत नाही आणि मायबाप सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहायला तयार नाही. त्यामुळे शेतीला अवकळा आली आहे. शेतात कापूस फुटून आहे. येत्या चार दिवसांत ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता असल्याचा हवामान खात्याने अंदाज वर्तविली आहे.
कोणत्याही क्षणी वादळी पाऊस येण्याची शक्यता आहे. पांढरे सोने झाडावरच लोंबकळत आहे. कोणत्याही क्षणी लाखमोलाचा कापूस वादळी पावसाने भुईसपाट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. कापूस वेचणी मजुरी प्रति किलो १० रुपये मोजावे लागतात. त्या तुलनेत दर मात्र वाढले नाही. खत, औषधे, बियाणे, मशागतीसह इतर साहित्याचे दर वाढले; पण कापसाचे भाव ‘जैसे थे’च आहेत.