maharashtra-government-announces-special-task-force-to-prevent-farmer-suicides : कृषी तज्ज्ञ आणि मानसोपचारतज्ज्ञांच्या मदतीने ‘चतुःसूत्री मॉडेल’द्वारे राबवणार उपाययोजना
Mumbai राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेता, महाराष्ट्र सरकारने बुधवारी (११ फेब्रुवारी २०२६) एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना केवळ आर्थिक मदत किंवा नुकसानभरपाई देण्यापुरते मर्यादित न राहता, त्यांच्या मानसिक, सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीचा एकत्रित आढावा घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी विशेष “शेतकरी आत्महत्या प्रतिबंध टास्क फोर्स” स्थापन करण्यात आला आहे. अशा प्रकारची समर्पित यंत्रणा कार्यान्वित करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.
या टास्क फोर्सचे नेतृत्व कृषी विभागाच्या विस्तार व प्रशिक्षण विभागाचे संचालक रफीक नाईकवाडी करणार आहेत. त्यांच्या नेतृत्वाखालील या पथकात सुनील बोरकर, उदय देशमुख, गणेश घोरपडे, जीवन बुंदे, नंदकिशोर नाईनवाड, सत्यजित शितोळे आणि सोनाली शिळकर यांसारख्या अनुभवी प्रशासकीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, केवळ प्रशासकीय अधिकारीच नव्हे, तर कृषी समाजशास्त्रज्ञ आणि मानसिक आरोग्य तज्ज्ञांनाही या दलात स्थान देण्यात आले आहे. यामुळे शासकीय निर्णयांना वैज्ञानिक आणि मानवी दृष्टिकोनाची जोड मिळणार आहे.
सध्या राज्यातील शेतकऱ्यांना हवामान बदल, नैसर्गिक आपत्ती, पिकांचे नुकसान, कर्जाचा डोंगर आणि बाजारभावातील अनिश्चितता अशा अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. या आर्थिक संकटांमुळे येणारा सामाजिक आणि मानसिक तणाव आत्महत्यांचे मुख्य कारण ठरत आहे. ही गंभीर बाब ओळखून या टास्क फोर्सची निर्मिती करण्यात आली आहे. केवळ आत्महत्या झाल्यानंतर मदत देणे हा यामागचा उद्देश नसून, आत्महत्येच्या मूळ कारणांचा अभ्यास करून ती रोखणे हा मुख्य हेतू आहे.
https://sattavedh.com/sudhir-mungantiwar-signals-of-action-against-kishor-jorgewar-over-violation-of-party-disciplin
या कार्यात तज्ज्ञांची मदत घेतली जाणार असून, ‘शिवार फाऊंडेशन’च्या माध्यमातून संशोधन करणारे कृषी समाजशास्त्रज्ञ डॉ. विनायक हेगाणा आणि महिला शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सृष्टी डोईजड यांची विशेष सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे ग्रामीण भागातील पुरुष आणि महिला शेतकऱ्यांच्या मानसिक आरोग्यावर अधिक प्रभावीपणे काम करणे शक्य होणार आहे.
हा टास्क फोर्स प्रामुख्याने ‘चतुःसूत्री’ (चार स्तरीय) उपाययोजना मॉडेलवर काम करणार आहे. यामध्ये खालील चार प्रमुख पैलूंवर भर दिला जाईल: १. तांत्रिक मार्गदर्शन २. आर्थिक स्थैर्य ३. सामुदायिक मदत (Community Support) ४. मानसिक समुपदेशन








