Demand for redistribution of water from Khadakpurna Dam : पाण्यासाठी आवाज उठवणार; खडकपूर्णा धरणाच्या पाण्याचे पुनर्वाटप करण्याची मागणी
Buldhana सिंदखेडराजा मतदारसंघातील खडकपूर्णा धरण आहे. तालुक्याच्या बहुतांश भागाला त्याचा लाभ मिळत नाही. “धरण उशाला आणि कोरड घशाला” अशी स्थिती तालुक्यात निर्माण झाली आहे. त्यामुळे खडकपूर्णा धरणाच्या पाण्याचे पुनर्वाटप करून सिंदखेडराजा तालुक्याच्या सर्व गावांना पाणी द्यावे, अशी मागणी आमदार सिद्धार्थ खरात यांनी केली आहे.
खडकपूर्णा धरणातून वाया जाणारे पाणी मिळावे, यासाठी शिवणी आरमाळ येथील प्रयोगशील शेतकरी कैलास नागरे यांनी बलिदान दिले. त्यानंतर आमदार मनोज कायंदे यांच्या प्रयत्नातून चौदा गावांचा समावेश खडकपूर्णा प्रकल्पात करण्यात आला. यामुळे देऊळगाव राजा आणि काही प्रमाणात सिंदखेडराजा तालुक्यालाही लाभ होणार आहे.
मात्र डोरव्ही, मलकापूर पांगरा, शेंदुर्जन आदी गावांना अद्यापही पाणी मिळणार नाही, ही बाब स्थानिकांमध्ये नाराजीचा विषय ठरत आहे.
नागरिकांच्या या मागणीवर आमदार सिद्धार्थ खरात यांनी लक्ष घालत, या भागासाठी कालव्याद्वारे पाणी देण्यासाठी आपण सभागृहात आणि थेट पालकमंत्र्यांकडे ही मागणी लावून धरणार असल्याचे स्पष्ट केले.
“बाहेरच्या जिल्ह्यांसाठी पाणी आरक्षित ठेवण्यापूर्वी आमच्या तालुक्यातील पाण्याचे नियोजन करा,” असा ठाम आग्रह त्यांनी व्यक्त केला. तालुक्यात तयार केलेल्या कालव्यांमधून आजतागायत एक थेंब पाणी आलेले नाही. मग हे कालवे कोणासाठी? आणि या कामांवर खर्च केलेले पैसे कोणाच्या घशात गेले? असा थेट सवालही आमदार खरात यांनी उपस्थित केला.
“लोकप्रतिनिधी एकदा निवडून गेले की, त्यांना पक्षापेक्षा जनतेचे हित महत्त्वाचे वाटले पाहिजे. पाणी मिळाले नाही, याला शेतकरी जबाबदार नाहीत. पण जर आधीच लक्ष दिले गेले असते, तर आज सिंदखेडराजा तालुका पाणीदार झाला असता,” असे म्हणत आमदार खरात यांनी अन्य प्रतिनिधींच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.शेवटी, “पाणी मिळवण्यासाठी जर आंदोलन करावे लागले, तर मी सर्वात पुढे राहीन,” अशी ठाम ग्वाहीही त्यांनी दिली.