Fadnavis said, the emphasis remains, citizens should take care : फडणवीस म्हणाले, जोर कायम, नागरिकांनी घ्यावी काळजी
Mumbai : महाराष्ट्रभर पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या सर्व भागांत मुसळधार पावसाने जोर धरला आहे. हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी, असं आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आलं आहे.
मुंबईत तर परिस्थिती अधिकच गंभीर आहे. शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचलं असून वाहतुकीवर मोठा परिणाम झालेला आहे. काही ठिकाणी वाहनांची लांबलचक रांग लागली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधताना मुंबईसह राज्यातील पावसाची माहिती दिली. मुंबईतील चेंबूर परिसरात तब्बल १७७ मिमी पाऊस नोंदवला गेला. शहरात आणि पूर्व उपनगरात पावसाचा जोर अधिक आहे. एकूण १४ ठिकाणी पाणी साचलं असून त्यापैकी २ ठिकाणी वाहतूक पूर्णपणे थांबवावी लागली आहे. उर्वरित ठिकाणी वाहतूक मंद गतीनं सुरू आहे.
मुंबईसाठी हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. लोकल गाड्या थांबलेल्या नसल्या तरी उशिरा धावत आहेत. डॉप्लर रडारनुसार पुढील १० ते १२ तास पावसाचा तीव्र जोर राहणार आहे. परिस्थिती पाहता दुपारच्या सत्रात मुंबईतील शाळांना सुट्टी देण्यात आली. मंत्रालयातील कर्मचाऱ्यांनाही दुपारी चारनंतर घरी जाण्याची परवानगी दिली आहे. आज संध्याकाळी सहा-साडेसहा नंतर समुद्रात तीन मीटरपर्यंतच्या लाटा उसळतील. उद्या त्या चार मीटरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. भरतीच्या काळात पावसाचा जोर वाढल्याने समुद्र आणि नाल्यांची पातळी समान होण्याची भीती आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पंपिंगची तयारी मुंबई महापालिकेकडून करण्यात आली आहे.
Chandrashekhar Bawankule : तहसीलदारांच्या खुर्चीवर बसून गाणी म्हणणारा तहसीलदार निलंबीत !
फडणवीस म्हणाले, “समुद्राच्या लाटांचा नजारा पाहण्यासाठी अनेक जण धोकादायक ठिकाणी जातात. कृपया असं करू नये. सुरक्षित राहा, प्रशासनाच्या सूचनांचं पालन करा.” तसेच हवामान विभाग व डॉप्लर अलर्टनुसार पुढील निर्णय घेतले जातील, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
_____








