nitin-gadkari-approves-913-crore-six-lane-bridge-panchganga-river-kolhapur : पुणे-बंगळूर महामार्गाचा कायापालट होणार; साडेतीन किलोमिटरचा उड्डाणपूल पुराच्या संकटावर कायमस्वरूपी तोडगा ठरणार
Kolhapur कोल्हापूरकरांसाठी केंद्र सरकारकडून विकासाची मोठी भेट मिळाली आहे. कोल्हापूर शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि पावसाळ्यातील पुरामुळे ठप्प होणारा राष्ट्रीय महामार्ग, या दोन्ही समस्यांवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कायमस्वरूपी तोडगा काढला आहे. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग (NH-48) अंतर्गत पंचगंगा नदीवर ९१३ कोटी रुपये खर्चाच्या सहा-लेन पिलर उड्डाणपुलाला केंद्र सरकारने अधिकृत मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे कोल्हापूरच्या दळणवळण क्षेत्रात क्रांती होणार आहे.
कोल्हापुरात दरवर्षी पावसाळ्यात पंचगंगा नदीची पातळी वाढली की महामार्गावर पाणी येते, ज्यामुळे दक्षिण भारताला जोडणारी वाहतूक कित्येक दिवस ठप्प होते. प्रस्तावित साडेतीन किलोमीटर लांबीचा हा उड्डाणपूल पिलरवर आधारित असल्याने पुराच्या पाण्यातही वाहतूक सुरळीत राहील. सध्याच्या पुलालगतच हा नवीन सहा-लेन पूल उभारण्यात येणार असून, यामुळे भविष्यातील ५० वर्षांच्या वाहतुकीचा विचार करण्यात आला आहे.
९१३ कोटींच्या या निधीतून केवळ पूलच नव्हे, तर संपूर्ण परिसराचा चेहरामोहरा बदलला जाणार आहे. अवजड वाहने आणि स्थानिक वाहतूक यांच्यासाठी स्वतंत्र मार्गिका असतील. प्रकल्पात सेवा रस्ते (Service Roads), जंक्शन सुधारणा आणि अंडरपासचा समावेश आहे, ज्यामुळे शहरातील स्थानिक वाहतूक महामार्गावर न येता सुरक्षितपणे सुरू राहील. वाहतूक कोंडी संपल्यामुळे दिल्ली ते चेन्नई दरम्यान धावणाऱ्या वाहनांच्या प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल.
Supriya sule : अजित पवारांच्या विमान दुर्घटनेवर रोहित पवारांचा संशय !
कोल्हापूर हे पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाचे व्यापारी केंद्र आहे. या उड्डाणपुलामुळे कोल्हापूरच्या औद्योगिक वसाहतींमधील मालवाहतूक अधिक वेगवान होईल. “अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हा जागतिक दर्जाचा पूल उभारला जाईल,” असे आश्वासन नितीन गडकरी यांनी दिले आहे. या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून प्रत्यक्ष कामाला गती मिळण्याची शक्यता आहे.








