BJP leader Chandrashekhar Bawankule’s attack on Shiv Sena and Maharashtra Navnirman Sena : सत्ता त्यांनी विसरून जावी, पुढील १५ वर्षे महायुतीचेच राज्य
Nagpur : राज आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्रिकरणाचा फार उदो उदो केला जात आहे. त्यांच्या एकत्रिकरण सोहळ्याच्या गर्दीचेही किस्से सांगितले जात आहेत. पण एक वास्तव नाकारून चालणार नाही की, त्यांच्या त्या सोहळ्यापेक्षा जास्त गर्दी आमच्या प्रदेशाध्यक्षांच्या पदग्रहण सोहळ्याला होती, असे म्हणत राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे बंधुंच्या त्या सोहळ्यातील हवा काढण्याचा प्रयत्न केला.
नागपुरात माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, त्यांच्या प्रकारांना जनता कंटाळली आहे. लोकांना फक्त विकास पाहिजे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा चांगला विकास करत आहेत. त्यामुळे पुढील १५ वर्षे महायुतीचेच सरकार राहणार आहे. त्या लोकांनी सत्तेचे स्वप्नही बघू नये. त्यांचा ‘म’ मराठीचा नाही, तर महापालिकेचा आहे. दोन भावांच्या एकत्रिकरण सोहळ्याला काँग्रेसला बोलावले नाही. कारण काँग्रेसचा विषय उद्धव ठाकरेंसाठी संपलेला आहे. राहुल गांधी नेतृत्व करू शकत नाहीत, हे एव्हाना उद्धव ठाकरेंच्या लक्षात आलेले आहे.
विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही निवडून आलो. यावेळी मुंबई महानगरपालिकेतही महायुती निवडून येईल आणि उद्धव ठाकरे यांची दुकानदारी बंद होईल. जातीचं राजकारण केल्याचं ते म्हणतात. पण राज ठाकरे यांनीच सांगावे की आम्ही जातीचे राजकारण केव्हा केलं. त्यांनी अनाजी पंत कुणाला म्हटलं? कोणत्या जातीचा विषय केला? मग राज ठाकरे यांनी त्यांना थांबवलं का नाही, असे प्रश्न चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित केले.
Hindi Marathi Conspiracy : भांडण केले सत्तेसाठी अन् एकत्र येत आहेत, तेही सत्तेसाठीच !
राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार) नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांना मंचाच्या समोर खाली बसवलं. आमचा मंच असता तर सर्वांना मंचावर बसवलं असतं. आपल्याला मंचावर जागा मिळणार नाही, हे काँग्रेसच्या नेत्यांना माहिती होतं, त्यामुळे ते सोहळ्याला गेले नाहीत. दुसरं कारण म्हणजे बिहारमध्ये काँग्रेसला फटका बसेल, म्हणूनही काँग्रेस तेथे दिसली नाही. काँग्रेसची परिस्थिती फार वाईट झाली आहे, असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.