Ravi Rana’s initiative to end political enmity : राजकीय वैर संपवण्यासाठी रवी राणा यांचा पुढाकार
Amravati लोकसभा व विधानसभा निवडणुकीत बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यात टोकाचे वैर बघायला मिळाले. मात्र आता माजी आमदार बच्चू कडू यांच्यासोबतचे राजकीय वैर संपवण्यासाठी आमदार रवी राणा यांनी नवीन नारा दिला आहे. बच्चू-राणा भाऊ भाऊ, असा नारा देत, विकासाच्या मुद्द्यावर त्यांना चहासाठी घरी बोलवण्याकरिता पुढाकार घेण्याची तयारी दर्शवली आहे.
आता वैरही संपले. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासासाठी आजी-माजी आमदारांनी एकमेकांच्या घरी चहा प्यायला बोलवावे. त्याकरिता मी स्वत: पुढाकार घेत आहे. मी त्यांना माझ्या घरी चहा प्यायला सहर्ष आमंत्रित करतो, असे मैत्रीपूर्ण आवाहन आमदार रवी राणा यांनी रविवारी येथे केले.
Nitin Gadkari : आमदार, खासदार येतात जातात; लक्षात राहतं ते काम !
युवा स्वाभिमान पार्टीच्या १७ व्या वर्धापन दिनानिमित्त सांस्कृतिक भवन येथे स्वाभिमान महोत्सव २०२५चे आयोजन करण्यात आले. माँ जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधण्यात आले. संस्थापक अध्यक्ष आमदार रवी राणा व राष्ट्रीय कार्यकारणीच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
युवा स्वाभिमान महोत्सवदरम्यान विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून लाभार्थ्यांना साडेसहा कोटी रुपयांचे धनादेशाचे आमदार रवी राणा यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. महिला सकस आहार योजना, मोदी आवास योजना, पंतप्रधान आवास योजना, आरोग्य हेल्थ कार्ड, श्रावण बाळ, संजय गांधी व इतर शासकीय योजनांचा समावेश यामध्ये आहे. तसेच ७५०० पीआर कार्डचे वाटप झाले. आमदार रवी राणा यांच्या स्वखर्चातून २८०० सलून धारकांना सलून किटचे वाटप, तसेच अपंगांना १८० तीनचाकी सायकल, १५० व्हीलचेअरचे वाटप करण्यात आले.
स्वाभिमान महोत्सवाला हरिभक्त परायण ॲड. सागर महाराज देशमुख, वायएसपीचे राष्ट्रीय अध्यक्ष नीळकंठ कात्रे, माजी आमदार रमेश बुंदिले, उपाध्यक्ष जयंत वानखडे, कोषाध्यक्ष शैलेंद्र कस्तुरे, कमलकिशोर मालानी, अजय गाळे, हरित चरपे, ज्योती सैरीसे, सुमती ढोके, नाना आमले, संजय हिंगासपुरे, नितीन बोरेकर, सुखदेव तरडेजा, मिश्रा काका, अर्चना तालन, चंदा लांडे, सिंधू मतलाने, समीक्षा गोटेफोडे, ज्योती यावलकर, मीना आगाशे, उषा प्रधान आदी उपस्थित होते.
राष्ट्रीय पुरस्कार विजेते थापा यांचा सत्कार
या समारंभात आमदार रवी राणा यांनी राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित करीना थापाचा सत्कार केला. कठोरा मार्गावर जगदंबा अपार्टमेंटमध्ये आग लागली असताना, या साहसी मुलीने आपला जीव धोक्यात घालून गॅस सिलिंडर बाहेर काढून किमान ७० लोकांचे जीव वाचविले.