Vikhe Patils explanation after Bhujbal’s criticism : भुजबळांच्या टिके नंतर विखे पाटलांचे स्पष्टीकरण
Mumbai : बीडच्या महा एल्गार सभेत मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. “विखे आला आणि महाराष्ट्रात विखार पसरवून गेला. गेला तर गेला पण जीआर काढला,” अशी टीका करत भुजबळ म्हणाले की, “विखे पाटील हे गरज नसताना मनोज जरांगे यांच्याकडे वारंवार जातात. भाजपच्या लोकांना सांगतो तुमच्या लोकांना आवरा. मराठा समाज आणि आमच्या अंतर पडले, ते अंतर अंतरवलीच्या दरीद्री पाटलामुळे पडले आहे. जरांगे-पाटलांशी वारंवार भेटीगाठी घेणाऱ्या विखेंना सोडणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला.
या वक्तव्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी शांत पण ठाम शब्दात प्रत्युत्तर दिले. त्यांनी म्हटले, “माझी भूमिका पूर्णपणे स्पष्ट आहे ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लावला आहे. भुजबळ हे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांचा मी आदर करतो. मी सार्वजनिक जीवनात काम करत असताना ओबीसी-मराठा असा कधी भेदभाव जाणवला नाही. पुरोगामी महाराष्ट्रात सर्व समाज एकत्र सण साजरे करतो. आज आपण दिवाळी साजरी करत आहोत — ओबीसी दिवाळी आणि मराठा दिवाळी असं कधी झालं आहे का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
विखे पाटील म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे की, आमच्या डीएनएमध्ये ओबीसी आहे. त्यामुळे कुणीही गैरसमज करून घेऊ नये. कायद्याच्या चौकटीत बसवून मराठ्यवाड्यातील मराठा समाजाचा प्रश्न सोडवण्यात आला आहे. मी लवकरच भुजबळांना भेटणार आहे आणि त्यांना न्यायमूर्ती शिंदे यांच्या उपस्थितीत सर्व गोष्टी समजावून सांगणार आहे. त्यांचा गैरसमज दूर केला जाईल.”
दरम्यान, राज्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नावरूनही राजकीय वातावरण तापले आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीनंतर पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत आंदोलन पुकारले आहे. “राज्यभर काळी दिवाळी साजरी करून शेतकऱ्यांसाठी ओला दुष्काळ जाहीर करा आणि कर्जमाफी द्या,” अशी मागणी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी केली.
BJPs question ::दीड कोटींची ‘डिफेंडर’ कोणत्या कमिशनमधून आली?
या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, “राज्यासमोर मोठं संकट आलं होतं, म्हणूनच ३२ हजार कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं. मग शरद पवार यांना कसली अस्वस्थता आहे? आज लोक त्यांना मानत नाहीत, म्हणून स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. ते मुख्यमंत्री असताना त्यांनी कारखान्यांकडून सक्तीने पैसे वसूल केले. मग आज सरकारने घेतले तर त्यात काय गैर आहे?” असा टोला विखे पाटलांनी लगावला.
या सर्व घडामोडींमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा विषय पुन्हा केंद्रस्थानी आला असून दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांच्या परस्पर आरोप-प्रत्यारोपांनी राजकारण अधिक गतीमान झाले आहे.
_____