maharashtra-revenue-department-structure-approved-35876-posts-reform : ३५,८७६ पदांना मंजुरी, वीस वर्षांनंतर सुधारित आकृतीबंध लागू
Mumbai : राज्यातील महसूल प्रशासन अधिक सक्षम आणि गतिमान करण्याच्या उद्देशाने महसूल विभागाचा सुधारित आकृतीबंध मंजूर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकारातून हा निर्णय झाला असून यासाठी शासन निर्णयही जारी करण्यात आला आहे.
या नव्या आकृतीबंधानुसार महसूल विभागातील एकूण ३५ हजार ८७६ पदांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये ३४ हजार ५७६ नियमित पदे आणि १ हजार ३०० बाह्यस्रोतांद्वारे भरण्यात येणारी पदे समाविष्ट आहेत. मुद्रांक, भूमी अभिलेख आणि महसूल या तिन्ही विभागांचा एकत्रित विचार करून हा आराखडा तयार करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे तब्बल वीस वर्षांनंतर महसूल विभागाच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या रचनेत बदल करण्यात आला आहे. यापूर्वी २००६ साली हा आकृतीबंध निश्चित करण्यात आला होता. वाढत्या कामाच्या व्यापामुळे आणि बदलत्या प्रशासकीय गरजांमुळे हा बदल आवश्यक ठरला होता. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्य सचिव राजेश अग्रवाल आणि अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्याशी चर्चा करून या प्रस्तावाला गती दिली. त्यानंतर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीने या आराखड्याला मंजुरी दिली.
नवीन संरचनेनुसार राज्यात ६ विभागीय आयुक्तालये, ३६ जिल्हाधिकारी कार्यालये, १९२ उपविभागीय कार्यालये आणि ३६० तहसीलदार कार्यालयांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच २ हजार ६२५ मंडळ कार्यालये आणि १५ हजार ७४७ तलाठी साजांची पदे मंजूर करण्यात आली आहेत. प्रशासकीय सुलभतेसाठी ११ नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालये, ८ उपविभागीय कार्यालये, २ तहसीलदार कार्यालये आणि ६९ अपर तहसीलदार कार्यालयांना मान्यता देण्यात आली आहे.
या सुधारित आराखड्यामुळे महसूल यंत्रणा अधिक लोकाभिमुख होण्यास मदत होणार असून नागरिकांना सेवा अधिक वेगाने आणि सुलभ पद्धतीने मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. उमाकांत दांगट समितीच्या शिफारशींनुसार हा आकृतीबंध तयार करण्यात आला असून आधुनिक आणि पारदर्शक प्रशासनाकडे हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
Navneet Rana : ठाकरेंपुढे ‘हनुमान चालीसा’ पठणाशिवाय पर्याय नाही, नाहीतर शिल्लक सेनेवरही ‘गदा’!
या निर्णयाबाबत बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा असल्याचे नमूद करत बदलत्या काळानुसार वाढलेल्या कामाच्या व्यापाला प्रतिसाद देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले. नवीन कार्यालयांमुळे नागरिकांना कामासाठी दूर जावे लागणार नाही आणि प्रशासकीय कामकाजात गती येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
___








