Teacher’s constituency : शिक्षक मतदारसंघातील मतदारसंख्या घटली

Who Will Be Affected by the Reduction of 2,419 Voters?: २,४१९ मतदार कमी झाल्याचा फटका कोणाला बसणार?

Amravati अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या प्राथमिक नोंदणीची मुदत ६ नोव्हेंबरला संपली असून, आता २५ नोव्हेंबर रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. यंदा अमरावती जिल्ह्यात तब्बल २,४१९ शिक्षक मतदारांची नोंदणी कमी झाल्याचे समोर आले आहे. सन २०२० मधील निवडणुकीत एकूण १०,३८६ मतदार होते, तर यंदा केवळ ७,९६७ मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यामुळे घटलेल्या मतदारसंख्येचा फटका नेमका कोणत्या पक्षाला किंवा उमेदवाराला बसणार, याची चर्चा शिक्षक संघटनांमध्ये सुरू झाली आहे.

विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघासाठी मागील निवडणूक १ डिसेंबर २०२० रोजी पार पडली होती. या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने नव्या मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम १२ सप्टेंबर २०२५ रोजी जाहीर केला. या प्रक्रियेनुसार १ नोव्हेंबर २०२५ हा अर्हता दिनांक निश्चित करण्यात आला.

Nitin Gadkari : वाद्यांच्या फ्यूजनची नागपूरकरांवर ‘संगीत मोहिनी’

मतदार नोंदणी अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांनी शिक्षकांना अधिकाधिक नोंदणीसाठी प्रोत्साहन देत तीन वेळा नोटीसद्वारे पुनःप्रसिद्धी केली होती. तरीदेखील जिल्ह्यातील शिक्षकांची नोंदणी अपेक्षेइतकी वाढली नाही. प्राथमिक आकडेवारीनुसार, यंदा पुरुष व महिला शिक्षक मिळून एकूण ७,९६७ मतदारांची नोंदणी झाली आहे.

सन २०२० मध्ये ६,९५८ पुरुष व ३,४२८ महिला मतदार अशी एकूण १०,३८६ मतदारांची नोंद होती. त्यामुळे यंदाच्या यादीत जवळपास २४ टक्क्यांनी घट झाल्याचे स्पष्ट दिसते. तथापि, मतदार नोंदणी सुरू असल्याने पुरवणी यादीत काही नावे समाविष्ट होतील, अशी माहिती नायब तहसीलदार (निवडणूक) प्रवीण देशमुख यांनी दिली.

६ नोव्हेंबरपर्यंत प्राप्त झालेल्या अर्जांनुसार जिल्ह्यातील नोंदणी पुढीलप्रमाणे आहे — अमरावती तालुका ३,९६७, चांदूर रेल्वे १४२, धामणगाव १७८, नांदगाव खंडेश्वर २०६, भातकुली ८३, तिवसा १०१, दर्यापूर ३४५, अंजनगाव सुर्जी ४५३, धारणी २५३, चिखलदरा ४२, अचलपूर ८५२, चांदूर बाजार ३०७, मोर्शी ३८७ आणि वरूड तालुका ६५१.

Sharad Pawar : मनसेला आघाडीत घेण्यास शरद पवारांना हरकत नाही!

शिक्षक व पदवीधर मतदारसंघासाठी प्रत्येक वेळी नव्याने मतदार यादी तयार करावी लागते. त्यामुळे शिक्षकांना वारंवार नोंदणी करावी लागते, हा प्रकार “तापदायक आणि वेळखाऊ” असल्याची नाराजी व्यक्त होत आहे. “एकदा शिक्षक किंवा पदवीधर म्हणून नोंदणी झाल्यानंतर प्रत्येक निवडणुकीला पुनःनोंदणीची गरज का?” असा सवाल शिक्षक मतदारांकडून उपस्थित करण्यात येत आहे.