Atrocity action against Pangaon Gram Panchayat for boycotting Pardhi community : पुरोगामी महाराष्ट्रात सामाजिक समतेच्या मुल्यांना गेला तडा
Nagpur : धाराशिव जिल्ह्याच्या कळंब तालुक्यातील पानगाव येथील पारधी बेड्यावर ग्रामस्थांनी बहिष्कार टाकला होता. पारधी विकास परिषदेने या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला. या बहिष्काराच्या घटनेला जबाबदार असलेल्या पानगावचे सरपंच आणि सर्व सदस्यांवर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम १९८९ अॅट्रॉसीटी अॅक्ट अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पारधी समाजावरील भेदभाव आणि त्यांच्या मुलभूत हक्कांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कायदेशीर कारवाई करण्यात आली असल्याचे आदिवासी पारधी समाज सेवक बबम गोरामन यांनी सांगितले.
पानगाव ग्रामपंचायतीने पारधी समाजावर टाकलेला बहिष्कार ही एक गंभीर आणि असंवैधानिक घटना आहे. या घटनेमुळे पुरोगामी महाराष्ट्रात सामाजिक समतेच्या दाव्यांना तडा गेला आहे. पारधी समाजाला पिण्याच्या पाण्यासारख्या मुलभूत गरजेसाठी चोरी करावी लागत असेल तर ही संपूर्ण समाजासाठी लज्जास्पद गोष्ट आहे. पुरोगामी महाराष्ट्रात अशा प्रकारच्या सामाजिक भेदभावाला आणि बहिष्काराला कोणतेही स्थान नाही.
प्रशासनाने पिडीत पारधी बांधवांच्या समस्यांकडे लक्ष देऊन त्यांना पिण्याचे पाणी, स्वच्छता, वीज, रस्ते यांसारख्या मुलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्या आणि या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी. या घटनेने सामाजिक समतेच्या दृष्टीने गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. पानगाव येथील पारधी समाजाला न्याय मिळावा आणि त्यांचे मुलभूत हक्क अबाधित राहावेत, यासाठी प्रशासनाने त्वरीत पावले उचलावी, अशी मागणी पारधी विकास परिषदेने केली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन पिडीतांना संरक्षण द्यावे, अशीही मागणी बबन गोरामन, अनिल पवार यांनी केली आहे.