Condemnation-of-the-protest-at-the-‘India-AI-Summit’ : ‘इंडिया एआय समिट’मधील आंदोलनाचा निषेध; काँग्रेसने देशाची माफी मागावी, उदय सामंत यांची मागणी
Pune राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी काँग्रेसच्या ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट’मधील आंदोलनावर अत्यंत तीव्र शब्दांत टीका केली आहे. पिंपरी-चिंचवड येथे पत्रकारांशी संवाद साधताना सामंत यांनी काँग्रेसवर देशाचा अपमान केल्याचा गंभीर आरोप केला. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस जागतिक स्तरावर भारताची प्रतिमा मलिन करत असून, मतदारांनी त्यांचे ‘कपडे’ आधीच फाडले आहेत, असा बोचरा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
दिल्लीत आयोजित ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट’ दरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी अंगातील टी-शर्ट काढून केलेल्या घोषणाबाजीचा सामंत यांनी जोरदार निषेध केला. ते म्हणाले की, जेव्हा संपूर्ण जगाचे लक्ष या महत्त्वपूर्ण परिषदेकडे लागले होते, तेव्हा काँग्रेसने असे अशोभनीय आंदोलन करून केवळ एका व्यक्तीचा नव्हे.
तर संपूर्ण देशाचा अपमान केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक स्तरावर भारताची प्रतिष्ठा उंचावली असताना, राहुल गांधी मात्र परदेशात जाऊन आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठांचा वापर करून देशाची मान खाली घालण्याचे काम करत असल्याचे सामंत यांनी नमूद केले.
Sunil Kayande : चिखला-काकड प्रकरणी सत्य बाहेर आणा; निरपराधांवरील कारवाई थांबवा
यावेळी सामंत यांनी राहुल गांधींच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांना ‘अपरिपक्व’ संबोधले. लोकसभेत आपली मते मांडण्याची संधी उपलब्ध असताना, अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय स्तरावर वागणे चुकीचे आहे, असे सांगत या कृत्याबद्दल काँग्रेसने देशाची माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली.
याच पत्रकार परिषदेत सामंत यांनी राज्याच्या औद्योगिक ‘एआय’ (AI) धोरणाबद्दल एक महत्त्वाची घोषणा केली. देशातील पहिले औद्योगिक ‘एआय’ धोरण येत्या चार महिन्यांत महाराष्ट्रात लागू केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. कृत्रिम बुद्धिमत्तेचा रोजगारावर होणारा परिणाम आणि त्याचे संभाव्य दुष्परिणाम कसे रोखता येतील, याचा सखोल अभ्यास सरकार करत आहे. एआय विकसित करण्यासाठी मानवी बुद्धिमत्तेचीच गरज असते, त्यामुळे कंपन्यांमधील उत्पादनासाठी मनुष्यबळाची आवश्यकता कायम राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
Governor Acharya Devavrat : समृद्धी महामार्गाचा गडचिरोलीपर्यंत विस्तार, तर विदर्भ होणार ‘स्टील हब’
चाकण परिसरातील वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी स्वतःला आलेल्या अनुभवाचा उल्लेख केला. या भागात सध्या रस्ते आणि पुलांची मोठी कामे सुरू असल्याने वाहतूक कोंडी होत असून, ही कामे पूर्ण होताच प्रवाशांना दिलासा मिळेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. एकूणच, उदय सामंत यांनी एका बाजूला काँग्रेसवर राजकीय प्रहार केला, तर दुसरीकडे महाराष्ट्राला एआय तंत्रज्ञानात आघाडीवर नेण्याचा सरकारचा मानस बोलून दाखवला.








