Vidarbha supporters burnt the Nagpur Pact : मेहकरात विदर्भवादी एकवटले, लढाई निर्णायक टप्प्यात असल्याचा दावा
Mehkar विदर्भाला महाराष्ट्रात सामील करताना १९५६ रोजी झालेल्या नागपूर कराराची अंमलबजावणी सरकारने कधीच केली नाही, असा आरोप करत आज मेहकर शहरात विदर्भ आंदोलन समितीच्या वतीने कराराची होळी करण्यात आली. या आंदोलनातून पुन्हा एकदा वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीला उधाण आले आहे.
जिजाऊ चौकात झालेल्या या आंदोलनाचे नेतृत्व समितीचे विदर्भ उपाध्यक्ष ॲड. सुरेश वानखेडे यांनी केले. यावेळी कार्यकर्त्यांनी “वेगळा विदर्भ झालाच पाहिजे” अशा गगनभेदी घोषणा देत नागपूर कराराची प्रत जाळली.
आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे की, नागपूर करारानुसार विदर्भाला शिक्षण, उद्योग, सिंचन, रोजगार अशा क्षेत्रांत योग्य न्याय देण्याची हमी होती. मात्र, सात दशकांनंतरही सरकारने त्या कराराकडे पाठ फिरवली. यामुळे विदर्भातील अनुशेष वाढत गेला आणि प्रादेशिक असमतोल तीव्र झाला, असा आरोप करण्यात आला.
या वेळी सोपानराव देबाजे, भाई कैलास सुखधाने, राधेशाम भराडे, दादासाहेब गवई, प्रा. डी. एस. वाघ, बी. बी. चौधरी, प्रा. विश्वनाथ बाहेकर, प्रल्हादराव रहाटे, ॲड. विनोद नरवाडे, संदिप गवई, रमेशराव इंगळे, पंडीतराव देशमुख, आश्रु मानवतकर यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
Chandrashekhar Bawankule : मोताळ्यात तहसीलदारच नाही, नागरिकांना होतोय त्रास
आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले की, विदर्भाला न्याय मिळवायचा असेल तर आता वेगळे राज्य हा एकमेव मार्ग आहे. “सरकारकडे मागण्या मांडूनही काही साध्य झाले नाही. विदर्भासाठी स्वतंत्र राज्याची लढाई आता निर्णायक टप्प्यात नेऊ,” असा इशारा यावेळी देण्यात आला.








