Congress attacks Aurobindo company (Auro Realty) : अरविंदो कंपनीच्या मुजोरीविरोधात वडेट्टीवारांचा सभागृहात आक्रमक पवित्रा
Mumbai : चंद्रपूर जिल्ह्यातील कोळसा खाणीत उत्खननासाठी स्फोटकांचा मोठा वापर होतो. अरविंदो कंपनीने तीन गावांचे पुनर्वसन न करता काम सुरू केले. त्यामुळे लोकांच्या घराला तडे गेले आहेत. या गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न, काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत उपस्थित केला. याप्रकरणी अटी शर्तीनुसार सबंधित कंपनीला पुनर्वसन बाबत निर्देश देऊ असे आश्वासन खणीकर्म मंत्री शंभूराजे देसाई यांनी दिले
विधानसभेत प्रश्नोत्तराच्या काळात चंद्रपुरातील खाणीमुळे सामान्य जनतेला होणाऱ्या अडचणींचा पाढा काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी विधानसभेत वाचला. अरविंदो कंपनीमार्फत रात्रीदेखील ब्लास्टिंग करण्यात येते. लोकं झोपू शकत नाही. या खाणीच्या कामामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. या कंपनीने गावातील जिल्हा परिषदेचा रस्ता खोदून ठेवला, घरांना तडे गेले आहेत.
वरून आदेश कुणाचा?
या कंपनीचे काम बंद करायला जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. पण वरून आदेश आल्यामुळे पुन्हा खाणीचे काम सुरू झाले. गावाचे पुनर्वसन न करता हे काम कसे सुरू झाले? गावकऱ्यांना काही मोबदला दिलेला नाही. त्यांना न्याय मिळणार का, असे प्रश्न वडेट्टीवार यांनी उपस्थित केले.
बैठक घेणार
या प्रश्नावर उत्तर देताना खणीकर्म मंत्री शंभूराजे देसाई यांनी या प्रकरणी अटी शर्ती असून गावांचे पुनर्वसन झाले नसेल तर याबाबत विहित कालावधीत पुनर्वसन करण्याचे लेखी आदेश देऊ, असे आश्वासन दिले. चंद्रपूर जिल्ह्यातील कोळसा खाणीमुळे पाण्याच्या स्रोत कमी झाल्याची तक्रार लोकप्रतिनिधींनी मांडल्यामुळे या प्रश्नावर सर्व लोकप्रतिनिधींची लवकर बैठक घेण्यात येईल, असेही खणीकर्म मंत्री देसाई यांनी स्पष्ट केले.