Special flight for Amravati residents stranded in Pahalgam : बोलके कुटुंब म्हणाले, ‘थोडक्यात वाचलो’
Amravati जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी (दि. २२ एप्रिल) झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अमरावतीचे ११ पर्यटक श्रीनगरमध्ये अडकले आहेत. या पर्यटकांना सुखरूप परत आणण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी तत्काळ हालचाली सुरू केल्या आहेत. महाराष्ट्र शासनाकडे विशेष विमान सेवेची मागणी केली आहे. या प्रयत्नांना प्रतिसाद देत शासनाने हेल्पलाइन सुरु केली आहे. लवकरच विशेष विमानाद्वारे या पर्यटकांना मूळगावी आणले जाणार आहे.
या पर्यटकांमध्ये मंगला बोलके यांचाही समावेश आहे. त्या आमदार सुलभा खोडके यांच्या सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहेत. सध्या त्या वाहतूक पोलिस विभागात कार्यरत आहेत. मंगला बोलके यांनी बुधवारी सकाळी ८.३० वाजता आमदार सुलभा खोडके आणि आमदार संजय खोडके यांच्याशी फोनवरून संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली. अमरावतीचे ११ पर्यटक ‘ट्युलिप लँड हॉटेल’, श्रीनगर येथे अडकले असल्याचे त्यांनी सांगितले.
Chandrashekhar Bawankule : बदललेल्या सकारात्मक वातावरणाला गालबोट लावले !
यावर आमदार खोडके दाम्पत्याने तात्काळ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संपर्क साधून या पर्यटकांना सुखरूप परत आणण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी केली. मंत्रालयात या संदर्भात विशेष हेल्पलाइन कार्यान्वित करण्यात आली असून, समन्वयासाठी महाराष्ट्र सदन, नवी दिल्लीच्या निवासी आयुक्त आर. विमला यांच्याशी संपर्क साधण्यात आला आहे.
दैव बलवत्तर होते…
‘बॅरसन खोऱ्यात जाणे टाळले, हेच बरे झाले,’ अशी प्रतिक्रिया बोलके यांनी दिली आहे. अमरावतीहून कुटुंबीयांसोबत काश्मीर पर्यटनाला गेलेल्या बोलके कुटुंबाने बॅरसन खोऱ्यात जाण्याचा निर्णय शेवटच्या क्षणी बदलला. त्यामुळे ते दहशतवादी हल्ल्यापासून थोडक्यात बचावले.
Jammu – Kashmir Attack : जम्मू – काश्मीरमधील पर्यटनावर होणार दुरगामी परिणाम !
बोलके म्हणाल्या, “आम्ही पहलगामच्या बॅरसन खोऱ्याकडे घोड्यावरून निघालो होतो. प्रवास फारच रम्य वाटत होता. मात्र, एक स्थानिक फोटोग्राफर आमचे फोटो काढण्यासाठी आग्रह धरू लागला. घोडेवाले आणि त्यांच्यात वाद झाला आणि आम्हाला बराच वेळ वाया घालवावा लागला. त्याचवेळी माझ्या थोरल्या बहिणीला (छाया देशमुख) रक्तदाबाचा त्रास जाणवू लागल्याने तिने खालीच थांबण्याचा निर्णय घेतला.”
“आम्ही काही अंतरावर चढाई केली, मात्र वेळ निघून जात असल्याने परतण्याचा निर्णय घेतला. आम्ही पुन्हा बेस पॉईंटवर पोहोचलो आणि थोड्याच वेळात बातमी आली की बॅरसन खोऱ्यात दहशतवादी हल्ला झाला. काळजाचा ठोका चुकला. हे ऐकून अंगावर काटा आला,” असे त्यांनी सांगितले.