Now terror in Pakistan; Schools closed, airports on high alert : रस्त्यांवर भयाण शांतता, नागरिकांवर भीतीचे सावट
पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी हल्ला करून भारतीय नागरिकांना ठार केले होते. त्यामुळे काश्मीर आणि भारतात दहशतीचे वातावरण पसरले होते. त्यानंतर १५ दिवसांत काल (६ मे) मध्यरात्री भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये हवाई हल्ले केले. या हल्ल्यात दहशतवाद्यांचे ९ अड्डे उद्धवस्त करण्यात आले आहेत. १५ दिवसांपूर्वी भारतवासीयांमध्ये दहशतीचे वातावरण होते. काल मध्यरात्रीच्या हल्ल्यानंतर आता पाकिस्तानमध्ये दहशत पसरली आहे.
भारतीय सैन्याने केलेल्या हल्ल्यात जवळपास १०० दहशतवादी मारले गेल्याचीही माहिती आहे. हल्ल्यानंतर पाकिस्तानातील रस्त्यांवर भयाण शांतता आहे, तर नागरिकांवर भीतीचे सावट आहे. दहशतवादी ज्या मशीदीमध्ये बैठका घ्यायचे, ती मशीदही उद्ध्वस्त झाली आहे. पाकिस्तानातील सर्वच विमानतळांवर हाय अलर्ट घोषीत करण्यात आला आहे. अनेक देशांतून पाकिस्तानात जाणारी विमाने माघारी फिरली आहेत. त्यामुळे पाकिस्तानच्या आकाशात विमानांच्या घिरट्या बंद झाल्या आहेत.
Operation Sindoor : भारतीय सैन्य आणि केंद्र सरकारच्या प्रत्येक कारवाईला पाठिंबा !
भारतीय सैन्याने केलेल्या हल्ल्यानंतर एलओसीवर पाकिस्तानकडून गोळीबार सुरू आहे. त्यामुळे सीमावर्ती भागात गस्त वाढवण्यात आली आहे. पाकिस्तानात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यासोबतच शंभरावर दहशतवाद्यांनाही कंठस्नान घालण्यात आल्याची माहिती आहे. ही कारवाई मर्यादित स्वरुपाची आहे. या हल्ल्यात केवळ दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आले आहे. पाकिस्तानच्या लष्करी पायाभूत सुविधांना कोणतेही नुकसान पोहोचवले नाही, असे भारतीय लष्कराने प्रसिद्धिस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद आणि पंजाबमधील सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. भारतीय सैन्याने केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानातील काही फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये रस्त्यांवर स्मशान शांतता आणि तणाव दिसत आहे. पहलगाम येथील हल्ल्यानंतर भारतात जी भीती निर्माण झाली होती, ती भीती आणि दहशत आज पाकिस्तानात पसरली आहे.