Irrigation well scam worth Rs 4.50 crore in Chikhli : मनसेची चौकशी आणि दोषींवर तात्काळ कारवाईची मागणी
Buldhana महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत 2024-25 या वर्षात चिखली पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रात मंजूर करण्यात आलेल्या 606 सिंचन विहिरींमध्ये सुमारे 4.50 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने MNS केला आहे. या संदर्भात 19 मे रोजी मनसेच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देत तात्काळ चौकशी व दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली.
प्रत्येक विहिरीसाठी लाभार्थ्यांकडून 70 हजार रुपये लाच स्वरूपात काही रोजगार सेवक, ग्रामसेवक, सचिव व खाजगी दलालांच्या माध्यमातून घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. विहिरींच्या मंजुरीसाठी आवश्यक असलेल्या ग्रामसभा, प्राधान्यक्रम आणि सामाजिक घटकांची अट धाब्यावर बसवून, केवळ पैशाची देवाणघेवाण करून प्रभावशाली व्यक्तींना विहिरी मंजूर करण्यात आल्याचा आरोप या निवेदनात आहे.
विशेष म्हणजे अनुसूचित जाती-जमाती, विधवा महिला, विकलांग, दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील कर्ते व अन्य पात्र लाभार्थ्यांना डावलून बोगस लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे.या पार्श्वभूमीवर मनसेने या संपूर्ण प्रक्रियेची स्वतंत्र चौकशी समितीमार्फत चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच, जे लाभार्थी अपात्र असून त्यांनी लाभ घेतला आहे, त्यांच्या विहिरी तत्काळ रद्द करून खऱ्या गरजू लाभार्थ्यांना लाभ देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
Operation Sindoor : ‘ऑपरेशन सिंदूर’चा जल्लोष नको, संयम बाळगावा !
या वेळी जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे, उपजिल्हाध्यक्ष राजेश परिहार, शहराध्यक्ष नारायण बापू देशमुख, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष शैलेंद्र कापसे, शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रदीप भवर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.