32 thousand destitute waiting for subsidy : ३२ हजार निराधारांचा अनुदानासाठी आर्त टाहो
Amravati जिल्ह्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत २ लाख ६६ हजार २६२ लाभार्थी आहेत. मात्र यातील तब्बल ३२ हजार लाभार्थ्यांना गेल्या सहा महिन्यांपासून कोणतेही अनुदान मिळालेले नाही. यामागचे मुख्य कारण म्हणजे संबंधित लाभार्थ्यांकडून आवश्यक कागदपत्रे वेळेत सादर न होणे व आधार प्रमाणीकरण प्रक्रिया अपूर्ण राहणे होय.
“साहेब, घरखर्चाला पैसे नाहीत… औषधासाठी द्या… जगण्यासाठी द्या!” — अशा हृदयद्रावक हाका निराधार लाभार्थी देत आहेत. मात्र प्रशासन त्यांना “धीर धरा” असे म्हणून आश्वासनांवरच निभावत आहे.
जिल्ह्यातील हजारो निराधारांना कागदपत्रे अपलोड करणे, आधार बँक खात्याशी लिंक करणे, आणि ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे या डिजिटल प्रक्रियांचे अवघड जाळे समजत नाही. त्यामुळे ऑनलाइन प्रक्रियेतील अडथळे आणि प्रशासनाकडून मिळणाऱ्या मर्यादित मदतीमुळे त्यांची अवस्था अधिकच बिकट झाली आहे.
संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजना यामार्फत पात्र लाभार्थ्यांना प्रत्येकी ₹१,५०० चे मासिक अनुदान शासनाकडून देण्यात येते. यामुळे औषधोपचार, जेवणखर्च यांसारख्या मूलभूत गरजा भागवण्याचा उद्देश असतो. मात्र अनुदान थांबल्याने अनेक वृद्ध, दिव्यांग आणि एकटे राहत असलेले नागरिक अन्नासाठीही दुसऱ्यावर अवलंबून राहण्यास भाग पडले आहेत.
Chandrashekhar Bawankule : नागरिकांचे मुलभूत प्रश्न तात्काळ मार्गी लावा; अधिकाऱ्यांना कानपिचक्या
डीबीटी प्रणालीतील तांत्रिक अडचणी हे अनुदान न मिळण्याचे प्रमुख कारण ठरत आहे. आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक नसणे, एनसीपीआय व आयआयएनशी मॅपिंग न होणे, ही तांत्रिक त्रुटी पेमेंट अयशस्वी होण्यामागे जबाबदार आहे.
या प्रकरणी जिल्हाधिकारी आशिष येरेकर म्हणाले, “जिल्ह्यातील सुमारे ३२ हजार लाभार्थ्यांचे पेमेंट आधार प्रमाणीकरणाच्या अभावामुळे थांबले आहे. आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या इतर लाभार्थ्यांना यशस्वीरित्या अनुदान देण्यात आले आहे. त्यामुळे उर्वरित लाभार्थ्यांनी तातडीने संबंधित प्रक्रिया पूर्ण करून सहकार्य करावे.”