Nitin Gadkaris warning No compromise on quality : नितीन गडकरींचा इशारा : गुणवत्तेवर तडजोड नाही’
Nagpur: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बांधकाम क्षेत्रातील दर्जा व कामकाजातील पारदर्शकतेबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. “राजकारण्यांच्या जवळचे कंत्राटदार, आर्टिटेक्ट यांना काम द्या, त्याला देऊ नका, असा सरकारी अधिकाऱ्यांवर दबाव असतो. मात्र, अशा दबावाला बळी न पडता चांगल्या दर्जाचे काम व्हायला हवे,” असे मत त्यांनी व्यक्त केले. ते इंडियन बिल्डिंग काँग्रेसच्या वार्षिक परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
गडकरी म्हणाले की, जे अधिकारी कामात हलगर्जी करतात त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. “प्रत्येकाने चांगले काम करायला हवे. त्याचे श्रेय निश्चित मिळते,” असे ते म्हणाले.
Local Body Elections : जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी दावेदारांचा शोध!
बांधकाम क्षेत्रामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कमी खर्चात किफायतशीर बांधकाम साहित्य वापरण्याची गरज असल्याचे गडकरी यांनी स्पष्ट केले. त्यांनी स्पष्ट केले की, गुणवत्तापूर्ण दृष्टिकोन ठेवूनच देशाला भक्कम पायाभूत सुविधा देता येतील.
सोशल मीडियावर ट्रोलिंगच्या मुद्द्यावर भाष्य करताना गडकरी म्हणाले, “हल्ली लहान-सहान गोष्टींमुळे आम्हाला ट्रोल केले जाते. एनएचआय व स्टेट पीडब्लूडीकडून मोठमोठे रस्ते व पूल तयार केले जातात. मात्र, डायव्हर्शन रस्त्यांमुळे वाहतूक कोंडीसह अनेक समस्या दिसतात. याबाबत सुधारणा करण्याचे निर्देश दिले आहेत.” मुंबई-गोवा महामार्गावरील डायव्हर्शनमुळे त्यांना सोशल मीडियावर शिव्या सहन कराव्या लागल्या, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव आबासाहेब नागरगोजे, आयबीसीचे अध्यक्ष सी. देबनाथ, तसेच आयबीसी राज्याध्यक्ष सुभाष चांदसुरे उपस्थित होते.
यावेळी त्यांनी सोशल मीडियावरील राजकीय मोहिमेबाबतही प्रतिक्रिया दिली. “पैसे देऊन माझ्याविरुद्ध सोशल मीडियावर मोहीम राबवण्यात आली होती. मात्र त्यात काहीही तथ्य नव्हते. हे सर्व मला राजकीयदृष्ट्या लक्ष्य करण्यासाठीच केले गेले होते,” असे गडकरी म्हणाले.
इथेनॉल मिश्रणाच्या मुद्द्यावर भाष्य करताना गडकरी म्हणाले, “इथेनॉल हे आयात पर्याय, किफायतशीर, प्रदूषणमुक्त आणि स्वदेशी आहे. भारत जीवाश्म इंधन आयात करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करतो. त्याऐवजी इथेनॉल वापरल्यास देशाच्या अर्थव्यवस्थेत बचत होईल. मका पासून इथेनॉल तयार करण्याच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना 45 हजार कोटी रुपये मिळाले आहेत.”