BJP criticizes demand to postpone elections : निवडणुका पुढे ढकलण्याचा मागणीवर भाजपाची टीका
Mumbai: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर भारतीय जनता पक्षाने जोरदार टीका केली आहे. “पराभवाच्या भीतीमुळे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत निवडणुका पुढे ढकलण्याचा डाव रचत आहेत,” अशी बोचरी टीका भाजपाचे राज्य माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी केली. ते मुंबईतील भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
बन म्हणाले, “संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांची पराभवाची गाळण उडाली आहे. त्यामुळे ते फुटकळ आरोप करत आहेत. काही ना काही निमित्त शोधून निवडणुका पुढे ढकलाव्यात, हा त्यांचा हेतू आहे. बिहारमध्ये मतदार याद्यांच्या दुरुस्तीसाठी अभियान राबवण्यात आले. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातही तसे अभियान चालवावे, अशी मागणी ते करणार आहेत का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
Help for affected farmer : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून १३५६ कोटी
ते पुढे म्हणाले, “बिहारमधील मतदार यादी दुरुस्ती (एसआयआर)ला विरोध करून आता महाराष्ट्रातील निवडणुका पुढे ढकला अशी मागणी करणे हे राऊतांचे नाटक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या नोटबंदीच्या निर्णयामुळे राऊत यांचा काळा पैसा पांढरा होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांना आजही त्या निर्णयाची पोटदुखी आहे,” असा टोलाही बन यांनी लगावला.
बन यांनी पुढे सांगितले की, “राऊतांमुळे उबाठा गटाची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) स्थिती दयनीय झाली आहे. उद्धव ठाकरेंनी आपल्या पक्षात ‘गुजरात पॅटर्न’ राबवून राऊत यांना बाजूला करावे. देवेंद्र फडणवीस यांना जनतेने तीन वेळा निवडून दिले आहे. त्यामुळे फडणवीस हे महाराष्ट्राचे राजकीय सुपरस्टार आहेत. उलट उद्धव ठाकरे आणि राऊत यांच्या नेतृत्वात केवळ अपयशच आले आहे. त्यामुळे सर्वात मोठे ‘लूजर’ कोण असतील तर ते राऊत आहेत,” असा घणाघात त्यांनी केला.
यावेळी बन यांनी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवरही प्रतिक्रिया दिली. “दिवाळी हा बळीराजाचा सण आहे. मराठवाड्यात अस्मानी संकट कोसळले असले तरी फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी प्रयत्नशील आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीचे पैसे जमा होत आहेत. ३२ हजार कोटींचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे,” असे त्यांनी सांगितले.
“या काळात शेतकऱ्यांना नाउमेद न करता त्यांना नव्या आशेचा किरण देण्याची गरज आहे. शरद पवार यांनी शेतकऱ्यांनी दिवाळी साजरी करू नये असे म्हणणे टाळावे. अस्मानी संकटामुळे आलेले नैराश्य दूर करून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य आणण्याचे काम भाजपा करत आहे,” असेही नवनाथ बन यांनी स्पष्ट केले.
या पत्रकार परिषदेत भाजपने ठाकरे गटावर हल्लाबोल करत महायुती सरकारच्या निर्णयांचे समर्थन केले.
_____








