bjp-congress-leaders-together-in-apmc-progeam : बाजार समितीच्या कार्यक्रमात दोन्ही पक्ष नेते एकत्र; स्थानिक राजकारणात नवे समीकरण
Khamgao खामगावच्या राजकारणात एकेकाळी टोकाचे वैर मानल्या जाणाऱ्या भाजप आणि काँग्रेस यांच्यातील वाढती जवळीक पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ‘शिदोरी गृह’च्या उद्घाटनाच्या निमित्ताने दोन्ही पक्षांचे नेते आणि पदाधिकारी एकाच मंचावर दिसल्याने स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा रंगू लागली आहे.
काही वर्षांपूर्वीपर्यंत खामगावमध्ये भाजप आणि काँग्रेस यांच्यातील संघर्ष अत्यंत तीव्र होता. विशेषतः माजी आमदार दिलीप सानंदा काँग्रेसमध्ये सक्रिय असताना दोन्ही पक्षांतील राजकीय संघर्ष अधिकच तीव्र स्वरूपात दिसून येत होता. मात्र सानंदा यांनी काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर शहरातील राजकीय वातावरणात काहीसा बदल झाल्याचे जाणकारांचे मत आहे.
याचा प्रत्यय खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीतही आला होता. त्या वेळी भाजप आणि काँग्रेसने एकत्र येत भूमिका घेतल्याचे चित्र पाहायला मिळाले होते. सानंदा यांचा बाजार समितीतील प्रभाव कमी करण्याच्या राजकीय गरजेतून भाजपने काँग्रेसला अप्रत्यक्ष पाठिंबा दिल्याची चर्चा त्यावेळी जोरात रंगली होती.
त्या घटनेनंतर खामगावच्या राजकारणात भाजप आणि काँग्रेस यांच्यातील संभाव्य जवळीक अधूनमधून चर्चेचा विषय ठरत आली आहे. आता पुन्हा एकदा बाजार समितीच्या कार्यक्रमात दोन्ही पक्षांचे नेते एकत्र दिसल्याने त्या चर्चांना नव्याने उधाण आले आहे. या कार्यक्रमाला काँग्रेसचे नेते ज्ञानेश्वरदादा पाटील यांची उपस्थिती विशेष चर्चेचा विषय ठरली.
Women’s day special : उच्चशिक्षित महिला सरपंचामुळे मेळघाटच्या ‘काटकुंभ’चा कायापालट!
दरम्यान, आगामी स्थानिक राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर खामगावमध्ये भाजप-काँग्रेसमध्ये काही नवे राजकीय समीकरण तयार होत आहे का, असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे. त्यामुळे येत्या काळात स्थानिक राजकारणात कोणती नवी घडामोड घडते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








