Historic decision by Katoda village; ‘no entry’ for party politics in cooperative elections : ‘गावगाडा आधी, राजकारण नंतर’; काटोडा ग्रामस्थांनी दिला एकतेचा आदर्श
Chikhli ग्रामीण भागातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांमुळे वाढणाऱ्या गटबाजीला आळा घालण्यासाठी चिखली तालुक्यातील काटोडा ग्रामस्थांनी एक ऐतिहासिक आणि धाडसी निर्णय घेतला आहे. गावातील सामाजिक सलोखा आणि नातेसंबंध जपण्यासाठी ग्रामसेवा सहकारी संस्थेच्या सदस्यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी कोणताही प्रतिनिधी न पाठवण्याचा एकमताने ठराव मंजूर केला.
गेल्या काही वर्षांत सहकारी संस्था आणि ग्रामपंचायत निवडणुका या गावपातळीवर संघर्षाचे केंद्र बनल्या आहेत. राजकीय पक्षांच्या थेट हस्तक्षेपामुळे नात्यागोत्यांत दुरावा निर्माण होऊन अनेक ठिकाणी भाऊबंदकी तुटल्याची उदाहरणे समोर आली आहेत. हाच अनुभव लक्षात घेत काटोडा ग्रामस्थांनी ‘राजकारणापेक्षा गावाची एकजूट महत्त्वाची’ अशी ठाम भूमिका घेतली.
Buldhana politics : रामसेतू पुलाला मंजुरी; बुलढाण्यात ‘श्रेयवाद’ पेटला
काटोडा ग्रामसेवा सहकारी संस्थेची विशेष सभा पार पडली. या सभेत बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या २०२६-२०३१ या कालावधीतील संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी प्रतिनिधी पाठवण्याचा मुद्दा चर्चेला आला. मात्र, संभाव्य गटबाजी टाळण्यासाठी कोणताही उमेदवार, सूचक किंवा अनुमोदक न पाठवण्याचा ठराव क्रमांक ५ सर्व १३ सदस्यांनी एकमताने मंजूर केला.
या ठरावाचे सूचक अशोक धूड तर अनुमोदक संदीप लहाने होते. चर्चेदरम्यान गावातील विविध राजकीय विचारांचे पदाधिकारी एकत्र येत, “एका प्रतिनिधीसाठी गावात वाद नको,” अशी भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले.
आजच्या सत्ताकेंद्रित राजकारणात जिथे पदासाठी टोकाचे संघर्ष पाहायला मिळतात, तिथे संपूर्ण निवडणूक प्रक्रियेपासून दूर राहण्याचा निर्णय घेणे हे अत्यंत दुर्मीळ उदाहरण मानले जात आहे. या निर्णयामुळे गावात संभाव्य संघर्ष पूर्णपणे टळला असून, सामाजिक ऐक्य अधिक बळकट झाले आहे.
काटोडा ग्रामस्थांच्या या निर्णयाची जिल्हाभरात चर्चा सुरू असून, इतर गावांसाठीही हा आदर्श ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ‘राजकारण समाजासाठी असावे, समाज फोडण्यासाठी नाही’ हा संदेश काटोडा गावाने आपल्या कृतीतून अधोरेखित केला आहे.








