Conflicts in mahayuti as bacchu kadu becomes mlc : आमदार तायडेंचा हल्ला सुरूच, अचलपूरमध्ये राजकीय चर्चा
Amravati अचलपूर मतदारसंघात भाजपचे आमदार प्रवीण तायडे यांनी मागील निवडणुकीत बच्चू कडू यांचा पराभव केला होता. त्यानंतरच्या राजकीय घडामोडींमध्ये बच्चू कडू यांनी आपला ‘प्रहार’ पक्ष एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत विलीन केला आणि विधान परिषदेत आमदार झाले. पण सातत्याने भाजपच्या आणि विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात विधान देणाऱ्या बच्चू कडूंना भाजप स्वीकारणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
मात्र, या निर्णयानंतर आ. तायडे यांनी बच्चू कडू यांच्यावर सातत्याने टीका सुरू ठेवली आहे. “बच्चू कडू शब्दावर ठाम राहत नाहीत. शेतकऱ्यांना भामटे म्हणणे, चारवेळा निवडून देणाऱ्या जनतेला मेंढरं संबोधणे, तसेच पूर्वी निधी गोळा करून नाटके केल्याचा इतिहास आहे. त्यांच्या संपत्तीचा हिशोब आमच्याकडे आहे,” अशा शब्दांत आ. तायडे यांनी कडू यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
दरम्यान, अचलपूरमध्ये पुन्हा बच्चू कडू यांच्याशी थेट राजकीय सामना होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अशा परिस्थितीत आ. तायडे यांची ही आक्रमक भूमिका केवळ राजकीय तयारीचा भाग आहे की, भारतीय जनता पक्ष कडून त्यांना अप्रत्यक्ष पाठबळ दिले जात आहे, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची भूमिका मांडल्यानंतर या राजकीय समीकरणांना अधिकच धार आली असून, अचलपूर मतदारसंघात आगामी काळात चुरशीची लढत पाहायला मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.








