
pm-narendra-modi-warning-on-global-energy-crisis-and-development-risk : परिस्थिती सुधारली नाही तर दशकांची प्रगती संपुष्टात येईल पंतप्रधान मोदी
New Delhi : कोरोना महामारीनंतर जगभरात निर्माण झालेली अस्थिरता, विविध देशांमधील सुरू असलेले युद्धसदृश वातावरण आणि वाढत चाललेले ऊर्जा संकट यामुळे संपूर्ण मानवजातीसमोर गंभीर आव्हान उभे राहिले असल्याचा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. नेदरलँड्समधील द हेग येथे भारतीय समुदायाला संबोधित करताना मोदी यांनी जागतिक परिस्थितीबाबत चिंता व्यक्त करताना, जर ही परिस्थिती वेळेत नियंत्रणात आली नाही तर गेल्या अनेक दशकांतील विकास आणि प्रगती धोक्यात येऊ शकते, असे स्पष्ट शब्दांत सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, जगाने आधी कोरोना महामारीचा मोठा फटका सहन केला. त्यानंतर अनेक भागांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आणि आता ऊर्जा संकटामुळे अर्थव्यवस्थांवर मोठा दबाव निर्माण होत आहे. या तिन्ही संकटांचा एकत्रित परिणाम जागतिक विकासावर होत असून अनेक देश पुन्हा आर्थिक अडचणीत सापडण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. विशेषतः गरीब आणि विकसनशील देशांवर याचा सर्वाधिक परिणाम होऊ शकतो, असेही त्यांनी नमूद केले.
पश्चिम आशियामध्ये वाढत असलेले तणाव, कच्च्या तेलाच्या दरांमध्ये सातत्याने होत असलेली वाढ आणि जागतिक स्तरावर निर्माण झालेली अनिश्चितता यामुळे ऊर्जा सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर बनला असल्याचे मोदी यांनी सांगितले. ऊर्जा क्षेत्रातील अस्थिरतेमुळे उद्योग, उत्पादन आणि रोजगार क्षेत्रावरही परिणाम होत असून जगातील अनेक अर्थव्यवस्थांचा विकासदर मंदावण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
भारताच्या प्रगतीचा उल्लेख करताना पंतप्रधानांनी देशाने मागील काही वर्षांत तंत्रज्ञान आणि उत्पादन क्षेत्रात मोठी झेप घेतल्याचे सांगितले. एकेकाळी मोबाईल फोन आयातीवर अवलंबून असलेला भारत आज जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोबाईल फोन उत्पादक देश बनल्याचे त्यांनी नमूद केले. भारताचे डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील नवकल्पना जगभरात चर्चेचा विषय ठरत असल्याचेही त्यांनी सांगितले.
स्टार्टअप क्षेत्रातील वाढीबाबत बोलताना मोदी म्हणाले की, काही वर्षांपूर्वी देशात केवळ काहीशे स्टार्टअप्स अस्तित्वात होते, मात्र आज भारतात दोन लाखांहून अधिक स्टार्टअप्स कार्यरत आहेत. २०१४ मध्ये देशात फक्त चार युनिकॉर्न कंपन्या होत्या, तर आता ही संख्या सुमारे १२५ पर्यंत पोहोचली आहे. भारतीय तरुणांनी नवकल्पना आणि उद्योजकतेच्या माध्यमातून देशाच्या अर्थव्यवस्थेला नवी दिशा दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सेमीकंडक्टर आणि चिप उत्पादन क्षेत्रातही भारत वेगाने पुढे जात असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. देशात सध्या १२ सेमीकंडक्टर प्रकल्पांवर काम सुरू असून त्यापैकी दोन प्रकल्पांमध्ये उत्पादनाला सुरुवात झाली आहे. “डिझाइन इन इंडिया, मेड इन इंडिया” या संकल्पनेच्या माध्यमातून भारत जागतिक चिप उत्पादन क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भारतातील युवा पिढीबद्दल बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, आजचा भारतीय युवा केवळ बदलाची अपेक्षा करत नाही, तर जगातील सर्वोत्तम आणि सर्वात वेगवान प्रगती साध्य करण्यासाठी प्रयत्नशील आहे. तरुणांच्या क्षमतेमुळे भारत आगामी काळात जागतिक स्तरावर अधिक मजबूत आणि प्रभावी देश म्हणून उदयास येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.








