Sudhir Mungantiwar Slams ‘Cockroach Janata Party’, Says Its Agenda Is BJP Opposition, Not Youth Welfare : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या यशस्वी कार्यपूर्तीनिमित्त पत्रकारांशी संवाद
Chandrapur युवकांच्या प्रश्नांवर काम करण्याचा आव आणणाऱ्या ‘कॉकरोच जनता पार्टी’चा खरा उद्देश युवकांचे कल्याण करणे हा नसून, केवळ भारतीय जनता पक्षाला विरोध करणे हाच आहे, असा थेट हल्लाबोल आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या यशस्वी कार्यपूर्तीनिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी नीट (NEET) परीक्षेतील कथित पेपरफुटीच्या मुद्द्यावरून विरोधकांच्या राजकारणाचे वाभाडे काढले. नीट परीक्षेतील कथित पेपरफुटीची घटना चिंताजनक असल्याचे मान्य करत मुनगंटीवार म्हणाले की, अशा संवेदनशील विषयांवर राजकारण करण्याऐवजी त्या पुन्हा घडू नयेत म्हणून प्रभावी उपाययोजना करणे गरजेचे आहे. केंद्र सरकार या विषयाकडे अत्यंत गांभीर्याने पाहत असून स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे यावर बारीक लक्ष आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
काँग्रेसला इतिहासाची आठवण करून देत त्यांनी सांगितले की, काँग्रेसच्या काळातील भीषण भोपाळ गॅस दुर्घटनेत हजारो लोकांना जीव गमवावा लागला आणि लाखो लोकांना यातना सहन कराव्या लागल्या, तरीही तत्कालीन काँग्रेस सरकार दोषींवर कठोर कारवाई करण्यात अपयशी ठरले होते. त्यामुळे केवळ राजकीय पोळ्या भाजण्यापेक्षा भविष्यात अशा गंभीर चुका टाळणे अधिक महत्त्वाचे आहे. ‘कॉकरोच जनता पार्टी’वर निशाणा साधताना मुनगंटीवार पुढे म्हणाले की, दिल्लीतील आंदोलनादरम्यान या पक्षाच्या नेतृत्वाने केलेल्या भाषणात युवकांना प्रेरणा देणारा, अभ्यासासाठी प्रोत्साहन देणारा किंवा चारित्र्यनिर्माणाचा संदेश देणारा एकही शब्द नव्हता. युवकांनी स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा आदर्श घ्यावा, कौशल्यविकास करावा किंवा राष्ट्रनिर्माणात योगदान द्यावे, यावर मार्गदर्शन करण्याचे सोडून संपूर्ण भाषणाचा केंद्रबिंदू केवळ भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) गरळ ओकणे हाच होता, असा गंभीर आरोप त्यांनी केला.
युवकांच्या नावाने स्थापन झालेली कोणतीही संघटना जर त्यांचे मूळ प्रश्न सोडविण्याऐवजी केवळ राजकीय विरोधाची दुकानदारी चालवत असेल, तर ती कधीही यशस्वी होऊ शकत नाही, असे सांगत मुनगंटीवार यांनी युवकांच्या भवितव्याशी खेळून स्वतःचा राजकीय फायदा लाटण्याचे हे प्रयत्न देशातील जनता चांगल्या प्रकारे ओळखून असल्याचा सणसणीत टोला लगावला. शेवटी, युवकांनी अशा नकारात्मक आणि पोकळ राजकारणाला बळी न पडता शिक्षण, कौशल्य, संस्कार आणि राष्ट्रहिताच्या विचारांशी जोडले जावे, असे आवाहन मुनगंटीवार यांनी केले.








