Congress and BJP trade allegations over the TET paper leak : पेपरफुटीवरून आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा; सरकारवर काँग्रेसचा हल्लाबोल, भाजपचा पलटवार
Buldhana शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला असला, तरी या प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पेपरफुटीचा मुद्दा आता केवळ परीक्षेपुरता मर्यादित न राहता सत्ताधारी आणि विरोधकांतील आरोप-प्रत्यारोपांचे प्रमुख राजकीय रणांगण ठरू लागला आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पेपरफुटीप्रकरणी राज्य सरकारवर जोरदार टीका करत, परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ झाल्याचा आरोप केला. सरकारने विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी आणि अशा घटना पुन्हा घडणार नाहीत, याची हमी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
याला प्रत्युत्तर देताना भाजपचे प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी काँग्रेसवरच निशाणा साधला. प्रत्येक संवेदनशील विषयावर राजकीय लाभ मिळविण्याचा प्रयत्न करणे ही काँग्रेसची जुनी पद्धत असल्याची टीका त्यांनी केली. सरकारने पेपरफुटीची माहिती समोर आल्यानंतर तातडीने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला असून, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
टीईटी परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयामुळे हजारो उमेदवारांना पुन्हा परीक्षेची तयारी करावी लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण असून, दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी उमेदवारांकडून होत आहे.








