Blackening the face of the MPSC Secretary is a sign that students’ patience has run out, says Vijay Wadettiwar : कथित भ्रष्टाचारामुळे राज्यातील हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले
Nagpur महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिवांच्या तोंडाला काळं फासण्याच्या घटनेनंतर राज्यातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमधील असंतोष आता अत्यंत गंभीर वळणावर पोहोचला आहे. ही घटना म्हणजे राज्यातील लाखो विद्यार्थी आणि पालकांच्या मनातील तीव्र संतापाचा आणि उद्रेकाचा परिणाम असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.
पत्रकारांशी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, वारंवार होणारे पेपरफुटीचे प्रकार आणि कथित भ्रष्टाचारामुळे राज्यातील हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले आहे. आम्ही या हिंसक कृत्याचे समर्थन करत नाही आणि कोणीही कायदा हातात घेऊ नये. मात्र, सरकारने या उद्रेकाची वाट न पाहता आता तरी या घटनेकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. विद्यार्थ्यांच्या मागण्या आणि भावनांकडे दुर्लक्ष करणे सरकारला महागात पडू शकते. तातडीने ठोस पावले न उचलल्यास हा जनक्षोभ अधिक तीव्र होईल.
Manoj jarange : जरांगेंना मुंबई आंदोलनाची परवानगी नाकारताच रात्रीतून सूत्रे हलली
सध्या संपूर्ण राज्यात एमपीएससी विरोधातील वातावरण चांगलेच तापले आहे. पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये विद्यार्थी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला काँग्रेससह महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांनी पाठिंबा दर्शवला असून, एमपीएससीच्या अध्यक्षांच्या तातडीने राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. दुसरीकडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी फेटाळून लावली आहे. विद्यार्थ्यांनी सुचवलेल्या अनेक सुधारणा आणि सूचना मान्य करण्यात आल्याचा दावा सरकारने केला आहे. तसेच, यापूर्वी स्पर्धा परीक्षांमध्ये झालेल्या सर्व घोटाळ्यांची आणि घोळांची विशेष तपास पथकाद्वारे चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
मात्र, सरकारच्या या निर्णयावर विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. एसआयटीची घोषणा ही केवळ टाईमपास आणि वेळकाढूपणा आहे. यापूर्वी स्थापन केलेल्या चौकश्यांचे काय झाले असा थेट सवाल विरोधी पक्षांनी उपस्थित केला आहे. सचिवांना काळे फासण्याच्या घटनेनंतर हे आंदोलन अधिक हिंसक आणि तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, प्रशासनावर तणाव वाढला आहे.








