Ministers served cashews and almonds at drought meeting; Opposition launches scathing attack on government : विरोधकांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल; कृषि मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आयोजित केली होती बैठक
Mumbai राज्यात दुष्काळाची दाहकता वाढली असून शेतकऱ्यांची उभी पिके डोळ्यांदेखत करपून जात आहेत. एकीकडे बळीराजा तातडीच्या मदतीसाठी आकाशाकडे डोळे लावून बसला असताना, दुसरीकडे नांदेडमध्ये दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी बोलावलेल्या उच्चस्तरीय बैठकीत मंत्री आणि आमदारांसमोर काजू-बदामाचा शाही पाहुणचार ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या संतापजनक प्रकारामुळे विरोधकांनी सत्ताधारी महायुती सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे.
शनिवारी राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी नांदेड विभागाची आपत्कालीन दुष्काळी आढावा बैठक आयोजित केली होती. मात्र, बैठक सुरू होताच मंत्री आणि लोकप्रतिनिधींच्या टेबलवर काजू-बदामाच्या प्लेट्स सजवण्यात आल्या. दुष्काळाच्या भीषण सावटाखाली पार पडणाऱ्या बैठकीतील या शाही थाटा’चा व्हिडिओ आणि फोटो समोर येताच सर्वस्तरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
वाद निर्माण होताच सामाजिक न्यायमंत्र्यांनी याचे खापर प्रशासनावर फोडत, अधिकारी अजिबात डोके वापरत नाहीत का असा संतप्त सवाल करत हात वर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या प्रकारामुळे विरोधकांच्या हाती सरकारला घेरण्यासाठी आयते कोलीत मिळाले आहे. शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार अंबादास दानवे यांनी यावरून सरकारवर घणाघाती टीका करत, “शेतकरी होरपळत असताना सरकारची ही कसली संवेदनहीनता असा सवाल केला.








