Solution on draught situation in two days, Chandrashekhar bawankule announces: मुख्यमंत्र्यांनी दुष्काळाच्या विषयाला सर्वाधिक प्राधान्य दिले असल्याची माहिती
Nagpur राज्यात सध्या दुष्काळाची परिस्थिती अत्यंत गंभीर झाली असून, शेतकरी संकटात सापडला आहे. विरोधकांकडून तातडीने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी जोर धरत असतानाच, सर्वेक्षणाचा सविस्तर अहवाल आल्याशिवाय थेट मदत जाहीर करता येत नाही. प्राथमिक अहवाल आल्यानंतर येत्या मंगळवारी किंवा बुधवारी महायुती सरकारतर्फे दुष्काळ निवारणासाठी ठोस उपाययोजना जाहीर केल्या जातील, अशी महत्त्वपूर्ण माहिती राज्याचे महसूलमंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
नागपुरात माध्यमांशी बोलताना त्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. दुष्काळाची भीषणता ध्यानात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयाला ‘टॉप प्रायॉरिटी’ दिले असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात स्पष्ट निर्देश दिले असून, त्यानुसार संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा आणि संबंधित विभागांचे अधिकारी रात्रं-दिवस कामाला लागले आहेत. संपूर्ण राज्यात अत्यंत वेगाने नुकसानीचा व दुष्काळी परिस्थितीचा सर्व्हे केला जात आहे.
महसूलमंत्र्यांनी पुढे सांगितले की, राज्यातील सर्व पालकमंत्र्यांना आपापल्या जिल्ह्यांतील परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या संकटकाळात केंद्र सरकारकडूनही मदत मागितली जाणार आहे. मात्र, केंद्रीय मदतीसाठी रीतसर सर्व्हे आणि एक अचूक आराखडा तयार करावा लागतो. सध्या दुष्काळाचा प्राथमिक अंदाज प्रशासनाला आला असून, पुढील एक-दोन दिवसांत सविस्तर पाहणी अहवाल शासनाकडे प्राप्त होईल. हा अहवाल हाती येताच महायुती सरकारकडून विलंब न करता शेतकऱ्यांच्या खात्यावर आणि दुष्काळग्रस्त भागांत तातडीने मदत पोहचवली जाईल, असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.








