Valmik Karad’s life is threatened by the Mahayuti Government said Vijay Wadettiwar : विजय वडेट्टीवारांचा पुनरुच्चार
Vijay Wadettiwar बीडमधील सरपंच हत्याकांड प्रकरणात वाल्मिक कराडला अटक झाली. पण त्यानंतरदेखील राज्यातील राजकारण तापलेलेच आहे. या मुद्द्यावर विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पुन्हा सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. वाल्मिक कराडच्या जीवाला सत्ताधाऱ्यांपासूनच धोका आहे. ज्यांच्यापर्यंत या प्रकरणाचे धागेदोरे जात आहेत, त्यांची चौकशी केली पाहिजे, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.
हिवाळी अधिवेशनापासून वाल्मिक कराडच्या अटकेची मागणी होत होती. अखेर मागील आठवड्यात त्याला अटक झाली व चौकशीला सुरुवात झाली. मात्र त्यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप आणखी वाढले. वडेट्टीवार यांनी कराडच्या एन्काऊंटरची शक्यता वर्तविली होती. आता त्यांनी वाल्मिक कराडच्या जीवाला सत्ताधाऱ्यांकडूनच धोका आहे, असा आरोप केला आहे.
कराड म्हणतो माझ्यासाठी सेवक ठेवा, जीवाला धोका आहे. जेल तुमचे, पोलीस तुमचे, सरकार तुमचे, मग कराडला धोका कुणापासून आहे, याचे उत्तर मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले पाहिजे. जर कराडच्या जीवाला खरोखरच धोका असेल तर त्याच्या मागे कोण लागले आहे, याची माहिती घेतली पाहिजे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्यांच्यापर्यंत या प्रकरणाचे धागेदोरे जात आहेत. ज्यांच्याकडे अंगुलीनिर्देश होत आहे त्यांची चौकशी केली पाहिजे, असं वडेट्टीवार म्हणाले.
मला तर कराडच्या जीवाला सत्ताधाऱ्यांकडूनच धोका असल्याचे वाटत आहे. विरोधकांचा या प्रकरणाशी काहीच संबंध नाही. आमच्याकडून कराडला काहीच धोका नाही. मात्र जवळच्या लोकांकडूनच त्याला धोका आहे. म्हणूनच त्याला भिती वाटत असावी. एकदाचे हे पाप धुतले जावे व स्वच्छ होऊन बाहेर पडावे. अशी सत्तेत बसलेल्या काही लोकांची इच्छा असेल. मूळापासूनच पुरावे नष्ट करण्याचे त्यांचे मनसुबे असतील, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला. वाल्मिक कराडच्या नावावरून सध्या महाराष्ट्रात राजकारण सुरू आहे. या राजकारणाचा महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर किती परिणाम होतो, हे वेळच सांगणार आहे.