Budget is not just poetry, Nana Patole’s taunt to Ajit Pawar : महायुतीचं निवडणुकीपूर्वीचं घोषणापत्र बघा, अन् आजचा अर्थसंकल्प
Mumbai : उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांची अर्थसंकल्पाची मांडणी चांगली होती. शेरोशायरीही त्यांनी चांगली केली. पण केवळ शायरी वाचून दाखवणे म्हणजे राज्याचा अर्थसंकल्प मांडणे नाही, अशी खोचक टिका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी केली. आज (१० मार्च) सभागृहात अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
नाना पटोले यांनी महायुतीच्या निवडणुकीच्या वेळेचे संकल्पपत्र दाखवले. ते म्हणाले, महायुतीने जे घोषणापत्र दिलं होतं. त्याची अंमलबजावणी या अर्थसंकल्पात बघायला मिळाली नाही. बजेटपेक्षा शेरोशायरीतच अर्थमंत्री जास्त गुंतलेले दिसले. मागच्या बजेटमध्येही फक्त ४७ टक्के पैसे खर्च केले गेले. बाकी यांच्याजवळ पैशांची व्यवस्था नाही. आजचंही बजेट तसेच आहे. शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची घोषणा फसवी ठरली. सरकार शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यासाठी प्रेरीत करत आहे.
Assembly Budget : काटोलच्या वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाची अर्थसंकल्पात घोषणा !
लाडक्या बहीणींच्या तोंडाला पाने पुसली..
लाडक्या बहीणींच्या भरोशावर सत्तेत आले, असं हेच लोक सांगतात. पण यांनी तर लाडक्या बहीणींच्याही तोंडाला पाने पुसली. २१०० रुपये देण्याचे वचन महायुतीने तोडले. आता बहीणीच त्यांचं काय करायचं ते करतील. रोजगार निर्मीतीच्या बाबतीत जी भूमिका मांडली होती, त्याबाबत पण कुठलीही व्यवस्था अर्थसंकल्पात केलेली दिसली नाही. या सरकारने तरुणांचीही फसवणूक केली आहे, असा आरोप पटोलेंनी केला.
महागाई कमी होणार नाही..
आज सादर केलेल्या अर्थसंकल्पानुसार महागाई कमी केली जाणार नाही. कारण महागाई वाढवण्याचा संकल्प सरकारने या बजेटमध्ये केला आहे. हे फसवे सरकार आहे. फसव्या महायुतीचा खरा चेहरा जनतेसमोर मांडण्याची भूमिका महाविकास आघाडीची आहे. बजेट आल्याआल्याच आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली. आम्ही आज सभात्याग केला. फसवं सरकार आणि जनतेला लुटणारं हे सरकार आहे. हे जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करणार आहोत.
विदेशी गुंतवणूक फसवी..
उत्पन्नापेक्षा खर्च जास्त, अशी या सरकारची अवस्था आहे. राज्यावर जवळपास ८ लाख कोटीचं कर्ज आहे. राज्य कर्जबाजारी करण्याचे काम करत आहेत. जनतेचा पैसा लुटण्याशिवाय हे सरकार काहीच करत नाही. उद्योगधंद्यांची वाढ ५.६ टक्क्यांवरून ४.९ टक्क्यांवर आली आहे. विदेशी गुंतवणूक आणल्याचे दाखवत आहेत. पण प्रत्यक्षात उद्योगधंद्यांची स्थिती बिकट आहे. ओद्योगिक क्षेत्रात प्रत्यक्ष गुंतवणूक आलेली नसल्याचे पटोले म्हणाले.
Salil Deshmukh : काटोलच्या वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाची अर्थसंकल्पात घोषणा !
मुख्यमंत्री शेतकरी नाहीत..
शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही. सन्मान योजनेमध्ये १५ हजार रुपये देण्याची घोषणा केली होती. तीसुद्धा बजेटमध्ये पहायला मिळाली नाही. जेव्हा शेतकऱ्यांचा माल निघतो, तेव्हाच सरकार माघार घेते. कारण मुख्यमंत्री शेतकरी नाहीत, त्यांना माहिती नाही. मी स्वतः शेतकरी आले, त्यामुळे मला माहिती आहे. एक एकरात सोयाबीनचे पीक काढायला १८ ते १९ हजार रुपये खर्च येतो. यामध्ये फार फार तर पाच क्विंटल पिक येते. सरकार भाव देत नाही म्हणून व्यापाऱ्यांना विकावे लागते. ते शेतकऱ्यांना परवडत नाही. मोदींचे ‘मित्रों’च्या गोदामात हा माल जातो, असा गंभीर आरोप पटोलेंनी केला.
आकाप्रमाणे जुमलेबाजी..
मुंबई, पुणे, नागपूर अशा काही जिल्ह्यांत दरडोई उत्पन्नाची स्थिती बरी आहे. पण इतर जिल्ह्यांचे काय, याचे उत्तर या अर्थसंकल्पात नाही. गडचिरोलीच्या बाबतीत अर्थमंत्र्यांनी जे सांगितलं की, त्यातही काही खरं नाही. त्यांना फक्त गडचिरोलीला लुटायचं आहे. त्यासाठी प्रलोभन देऊन आपले खिशे भरण्याचे काम सुरू आहे. यांचे दिल्लीत बसलेले आका ज्याप्रमाणे जुमलेबाजी करतात, तसेच त्यांचे येथील लोकही करायला शिकले, असा सणसणती टोलाही नाना पटोले यांनी हाणला.